

जरंडी, पुढारी वृत्तसेवा : जलसंधारण विभागाच्या पाझर तलावाच्या सांडव्यावरून शेतीसाठी असलेला रस्ता संबंधित ठेकेदाराने बंद केला, तसेच धरणाच्या खालून दिलेला पर्यायी रस्ता हा चुकीच्या पद्धतीने दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी बहुलखेड्यातील संतप्त दोनशे शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाझर तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकर्यांच्या या आंदोलनाची कुणकुण लागताच महसूल विभागाने तत्काळ दखल घेऊन शेतकर्यांची समजूत काढत आंदोलन एक दिवसासाठी स्थगित करण्याबाबत विनवणी केल्याने शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले; परंतु अद्यापही पाझर तलावाच्या घटनास्थळी संबंधित ठेकेदाराने भेट दिलेली नव्हती. त्यामुळे बहुलखेड्यातील शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. बहुलखेडा गावालगत जलसंधारण विभागाचा पाझर तलाव आहे.
या पाझर तलावाला ओलांडून पुढे सुमारे चारशे हेक्टर शेती क्षेत्र आहे; परंतु पाझर तलावाच्या संरक्षण-भिंतीवरून सलेला जुना वापरता रस्ता ठेकेदाराने बंद करून, नवीन रस्ता काढून दिला, परंतु या रस्त्याने शेतीच्या पेरण्या झालेल्या असल्याने हा रस्ता वापरण्याजोगा नसल्याचे संतप्त शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोनशे शेतकर्यांना पाझर तलावावरून असलेला जुना रस्ता शेताकडे जाण्यासाठी खुला करून द्यावा, अशी मागणी केली होती; परंतु जलसंधारण विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकर्यांनी पाझर तलावात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. महसूल विभागाला आंदोलनाची कुणकुण लागताच मंडळ अधिकारी मारोती धोंडकर पाझर तलावावर पोहोचले. रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत त्यांनी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला.
आंदोलनात चरणदास चव्हाण, भाईदास चव्हाण, साईदास चव्हाण, कडूबाई खरे, दुजेसिंग राठोड, अनिताबाई चव्हाण, भाईदास राठोड, परमदीबाई चव्हाण, सुरेश चव्हाण, शोभाबाई पाटील, शोभाबाई पाटील, अर्जुन पाटील, अनिल महाजन, दगडू जाधव, दशरथ जाधव, प्रेमसिंग जाधव, रणजित राठोड, एकनाथ राठोड आदी सहभागी झाले होते.
हेही वाचलंत का?