औरंगाबाद : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून सासरी आलेल्या विवाहितेने अवघ्या चार महिन्यांतच सासरच्या जाचाला कंटाळून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अश्विनी कुणाल देहाडे (वय19) रा. फ्लॅट क्र. 21, सैनिक विहार अपार्टमेंट, वाल्मी नाका, कांचनवाडी असे मृत विवाहितेचे नाव असून ती दोन महिन्यांची गरोदर होती. मंगळवारी (दि७) दुपारी ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पांढरी पिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथील माहेर असलेल्या अश्विनीचे वडील मेस्त्री काम करतात. अश्विनीच्या लग्नासाठी स्थळ पाहणी सुरुच असताना कुणालचे स्थळ आले. एकुलता एक मुलगा असल्याने आणि वाळूज एमआयडीसी भागात छोटीशी कंपनी चालवित असल्याने अश्विनीच्या वडिलांनी विवाहाला तयारी दर्शविली. फेब्रुवारी महिन्यात अश्विनी आणि कुणाल यांचे लग्न झाले होते. दोघांचे सुखी आयुष्य सुरु असतानाच वादाला सुरुवात झाली. सोमवारी रात्री अश्विनी आणि कुणाल यांच्यात वाद झाला. तेव्हा कुणालने तिचा गळा दाबला होता. भेदरलेल्या अश्विनीने आई-वडिलांना घटना सांगितली. त्यामुळे वडील, आई, लहान भाऊ व चुलती हे मंगळवारी सकाळीच कांचनवाडीत आले. सासरच्यांनी मुलीबद्दल अनेक तक्रारी केल्या. आई-वडिलांनी मुलीला समजावून सांगितले. मात्र, लगेचच तडजोड काही होत नव्हती. त्यामुळे आई-वडिलांनी मुलीला माहेरी घेऊन जाण्याचे ठरविले व तिला बॅग भरायला सांगितली. अश्विनी बॅग भरण्यासाठी बेडरुममध्ये गेली. तिने दरवाजा लावून घेतला आणि रागाच्या भरात सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये अश्विनी गंभीर जखमी झाल्याने तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का?