बीड : जमीन सुपीकता निर्देशांकानंतर शेणखताची मागणी वाढली; भावातही वाढ, पशुपालकांना फायदा

बीड : जमीन सुपीकता निर्देशांकानंतर शेणखताची मागणी वाढली; भावातही वाढ, पशुपालकांना फायदा
Published on
Updated on

बीड ; पुढारी वृत्‍तसेवा गेवराई तालुक्यात यावर्षी रासायनिक खत व बियाणांचे दर मागच्या वर्षीपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. या भाववाढीमुळे शेतकरी हैराण असतानाच शेणखताच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. जमीन सुपीकता निर्देशांकामध्ये मातीमध्ये नत्र व स्फूरद या अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्याने शेणखताची मागणी वाढली आहे.

गत काही वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांच्या वाढलेल्या वापरामुळे मानवी आरोग्यावर, तसेच शेतजमिनीवर दुष्परिणाम होत असल्‍याचे समोर आले आहे. गेवराई तालुक्यातील शेतातील मातीमध्ये नत्र व स्फूरदचे प्रमाण अत्यल्प असल्याचे माती परीक्षणानंतर निदर्शनास आले आहे.

मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्याचे सुपीकता निर्देशांकावरून समोर आले आहे. जस्त, लोहाचीही कमतरता आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी शेतात सेंद्रीय खतांचा वापर करत आहेत.

पशुपालक शेतकऱ्यांना शेणखताचा चांगला दर मिळत आहे. अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून पशुधन सभाळत नाहीत, तसेच ज्या शेतकऱ्यांकडे एखादे पशुधन असते ते शेतकरी शेणखत न विकता स्वत: च्या शेतात टाकत असतात. त्यामुळे शेणखत सहज उपलब्ध होत नाही. परंतु शेणखताने जमिनीची सुपीकता वाढते म्हणून शेणखताचा वापर वाढत आहे; परंतु शेणखताच्या एका ट्रॉलीसाठी तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. गेवराई तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर ही प्रमुख पीके आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे फळबागा असून भाजीपाल्याचे उत्पादनही शेतकरी घेतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल आता शेणखताकडे वाढत आहे.

शेणखताचे असे आहेत फायदे… 

शेणखत एकदा टाकल्यास पुढील दोन ते तीन वर्षे त्या शेतातील पिकाच्या उत्पादन वाढीस मदत करते. यासोबतच जमिनीचा पोत देखील सुधारतो. मानवी आरोग्याला या खताचा कसलाही धोका नाही. याउलट रासायनिक खताचा अनेकदा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो. शिवाय, रासायनिक खतांच्या वाढत्‍या वापरामुळे शेतजमीनी नापीक होत आहेत.

भाववाढीचा पशुपालकांना फायदा 

पशुपालक शेतकरी शेणखताला चांगला दर मिळत असल्याने त्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होत आहे. अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने पशुधन सभाळत नाहीत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे एखादे पशुधन असते. ते शेतकरी शेणखत न विकता स्वतःच्या शेतातच या शेणखताचा वापर करत आहेत. अशा शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याच्या शेतात शेणखताचा वापर प्रामुख्याने जास्त करण्यात येतो.

रासायनिक खतांचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो : तज्ज्ञांचे मत 

आमच्याकडे गाई, म्हशी असे पशुधन पूर्वीपासून आहे. आम्ही आमच्या शेतात शेणखताचा अधिक प्रमाणात वापर करतो. त्यामुळे पिक भरघोस येते.

रितेश निकम; आधुनिक शेतकरी मन्यारवाडी

हे ही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news