

Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. 20 ते 23 एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत हवामान अचानक बदलण्याची शक्यता आहे. पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांचा परिणाम जाणवणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
कोकण किनारपट्टी भागात 19 ते 21 एप्रिलदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या काळात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छीमारांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात 23 एप्रिलपर्यंत अधूनमधून पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा प्रभाव राहू शकतो. या बदलत्या हवामानाचा परिणाम दैनंदिन जीवनाबरोबरच शेतीवरही होण्याची शक्यता आहे.
काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अचानक होणाऱ्या गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आवश्यक खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सध्या राज्यातील तापमानात फारसा मोठा बदल अपेक्षित नाही. उन्हाळा कायम राहणार असला, तरी पावसामुळे काही भागात थोडा दिलासा मिळू शकतो.
वादळी वाऱ्यांच्या आणि विजांच्या वेळी उघड्या जागेत जाणं टाळावं. समुद्रकिनाऱ्याजवळ अनावश्यक वावर टाळावा. शेतकऱ्यांनी पिकं आणि जनावरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.