Youth Festival : युवा महोत्सवातून सामाजिक संस्कृती जोपासण्याचे काम : कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के

 Youth Festival
Youth Festival

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या मध्यावर्ती युवा महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संस्कृती जोपासण्याचे काम केले जात आहे,असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांनी केले. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४२ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवास समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख होते. (Youth Festival)

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ संचालक प्रा. डॉ. आर व्ही गुरव, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, संस्थेचे सचिव एच.यु पवार, निरीक्षक अशोक चौगुले, प्राचार्य डॉ. विजय लोंढे, निलेश डामसे,सुमनताई नागणे,डॉ.दत्तात्रय जाधव व मान्यवर उपस्थित होते.

या वेळी कुलगुरू शिर्के म्हणाले, "बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षात आयोजित या महोत्सवाचे शिवधनुष्य देशमुख महाविद्यालयाने लीलया पेलले आहे. शिक्षण आणि प्रशिक्षणाला विद्यालयाचे पाठबळ लाभले. विद्यार्थ्यांचा उत्साह, एकता आणि कष्टातून व्यवसायिक दर्जाच्या कलांचे सादरीकरण झाले. दरवर्षी महोत्सवातील विद्यार्थांचा सहभाग वाढत आहे. अन्य राज्यातील कलांचे सादरीकरण होत आहे. आम्ही दुसऱ्या राज्यात आणि दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी आमच्या महोत्सवात सहभागी होत आहेत. विद्यापीठाचा महोत्सव आता देशपातळीवर पोहोचला आहे." (Youth Festival)

अमरसिंह देशमुख म्हणाले, विद्यापीठाने महोत्सव आयोजनाची संधी दिली आणि तीन दिवसांचा हा महोत्सव अमाप उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. विद्यार्थांनादेखील नवीन कला आणि त्यांचे सादरीकरण अनुभवता आले. सर्वांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वीपणे पार पडला.

डॉ. गुरव म्हणाले, "विद्यार्थी विकासासाठी विद्यापीठ काम करत आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील सहभाग आणि दर्जा वाढला आहे. अनेक विद्यालयांचा सहभाग दिसत नाही; पण त्यांनी पुढील काळात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. देशमुख महाविद्यालयाने नेटके नियोजन केल्याने मध्यवर्ती युवा महोत्सव यशस्वी झाला.महोत्सवातील पहिल्या तीन विजेत्यांना पुढील महोत्सवात संधी मिळते. पण, थोड्या फरकाने चौथ्या पाचव्या नंबरच्या विद्यालयाना संधी मिळत नाही. याबाबत आणि अन्य सुधारणांबध्दल विद्यापीठाने फेरविचार करावा."

स्वागत प्रास्ताविकात प्राचार्य विजय लोंढे यांनी केले. प्रा.डी.के.मुल्ला आणि विद्यार्थ्यांनी मनोगतात ग्रामीण भागातील देशमुख विद्यालयाच्या योग्य नियोजनाचे कौतुक केले. मध्यवर्ती युवा महोत्सवात प्रथम कुलगुरु स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब पवार वैयक्तीक स्पर्धा जनरल चॅम्पीयनशीप फिरता चषक आणि अभिजीतदादा कदम सांघिक स्पर्धा जनरल चॅम्पीयनशीप फिरता चषक उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने पटकावला. विविध कला प्रकारातील महाविद्यालयांना आणि विद्यार्थांना कुलगुरू डॉ.डी. टी.शिर्के, अमरसिंह देशमुख,डॉ.आर.व्ही. गुरव व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news