बिद्री: पुढारी वृत्तसेवा: बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावर राज्य सरकारने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ आज (दि.२५) कारखाना प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करीत कामगारांनी निषेध सभा घेतली. कामगारांनी वेळ आलीच तर उपोषणास बसण्याची तयारी असल्याचे सांगितले. कामगारांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, कामगारांनी आज दिवसभर निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले.
'बिद्री'च्या डिस्टिलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
निदर्शने करीत कामगारांची कारखानास्थळी निषेध सभा
कामगारांची वेळप्रसंगी उपोषणास बसण्याची तयारी
यावेळी कामगार संचालक शिवाजी केसरकर म्हणाले की, बिद्री साखर कारखाना हा कुणा एकाच्या मालकीचा नाही. तर त्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. मात्र, केवळ राजकीय सुडबुध्दीने कोणी चांगल्या प्रकल्पावर चुकीची कारवाई करीत असेल, तर कामगार गप्प बसणार नाहीत.
कामगार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण फराकटे म्हणाले की, बिद्रीचा कारभार कसा आहे, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. मात्र, केवळ के. पी. पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. म्हणून त्यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने कारवाई करणे हे चुकीचे आहे. यापुढे कामगारांच्या वतीने तीव्र लढा उभा केला जाईल.
अजित आबिटकर म्हणाले की, या कारखान्यावर हजारो कामगारांची व लाखो शेतकऱ्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. कारखान्याच्या चांगल्या कारभारामुळे नावलौकिक झाला आहे. अशा कारखान्यावर झालेली कारवाई अत्यंत दुर्दैवी आहे.
अशोक फराकटे म्हणाले की, कारखान्याच्या कारभाराला आमदार प्रकाश आबिटकर केवळ राजकीय द्वेषापोटी सातत्याने विरोध करीत आहेत. वेळप्रसंगी आमरण उपोषण करावे लागेल. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग, कामगार उपस्थित होते.