![State excise department raids 'Bidri' ethanol project](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fa4f16c8c-09ed-4f39-8ed6-467e50819e4e%2FUntitled_design___2024_06_22T133628_492.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बिद्री : पुढारी वृत्तसेवा : बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क पथकाने शुक्रवारी (दि.२१) रात्री ११ वाजता धाड टाकून कागदपत्रांची रात्रभर छाननी केली. या धाडीबद्दल पथकाने कमालीची गुप्तता पाळली होती. पथक सकाळीच निघून गेल्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही. मात्र, उत्पादन व नोंदी यात त्रुटी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाची धाड
शुक्रवारी रात्री धाड टाकून कागदपत्रांची रात्रभर छाननी
धाडीबद्दल पथकाने कमालीची गुप्तता पाळली
बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पातून इथेनॉलचे उत्पादन सुरु केले आहे. मात्र, पावसाळ्यामुळे प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पासंबंधी शुक्रवारी रात्री ११ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारखाना कार्यस्थळावर कागदपत्रांची तपासणी केली. या पथकात १५ वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी होते. रात्रभर प्रकल्पाबाबत माहिती घेत कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या तपासणीबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. उत्पादन व नोंदी यात त्रुटी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक तपशील समजू शकला नाही.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांची भेट घेतली असता ते म्हणाले, १५ जणांच्या पथकाने कागदपत्रांची तपासणी केली आहे. आक्षेपार्ह काही दिसून आलेले नाही. पण पथकातील अधिकाऱ्यांचा अहवाल समजू शकला नाही. त्यांचा अहवाल प्राप्त होताच माहिती कळू शकेल.
बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर त्यांची लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर जवळीकता वाढली आहे. त्यामुळे या धाडीची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात सुरू झाली आहे.