पुढारी ऑनलाईन डेस्क : Vishalgad encroachment | विशाळगड परिसरात रविवारी (दि.14) झालेल्या हिंसाचाराच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेलेले खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांना पोलिसांनी रोखले. यासह पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींनाही पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी प्रसार माध्यमांना का रोखलं जातंय? हे समजलं नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली. तर, सत्य कधी ना कधी बाहेर येतंच, असे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पुढारी न्यूजशी बोलताना म्हटले. दरम्यान, पांढरेपाणी परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
विशाळगड अतिक्रमणमुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. गजापूर ते विशाळगड या सुमारे पाच किलोमीटर परिसरात प्रचंड दगडफेक, तोडफोड करण्यात आली. घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत आंदोलकांनी हल्लाबोल केला. दुकाने, वाहनांसह काही घरांची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सकाळी सातपासून सुरू झालेले तोडफोड, दगडफेकीचे प्रकार दुपारी चारपर्यंत सुरूच होते. यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. (Vishalgad encroachment)
दगडफेक, तोडफोडीत पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. यापैकी पाचजणांवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका पोलिसावर तलवार हल्ला झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, विशाळगडप्रश्नी कायदेशीर बाबी तपासून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तत्काळ केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विशाळगडावरील अतिक्रमणे काढावी, अशी मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांसह विविध संघटनांची सातत्याने आंदोलनेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. मात्र, त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. ही अतिक्रमणे काढण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांना हाक दिली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त दोन दिवसांपासून विशाळगड परिसरात येत होते. काही शिवभक्त तर शनिवारी रात्रीपासूनच विशाळगडावर आणि परिसरात मुक्कामाला थांबले होते.
हा सर्व प्रकार सुरू असतानाच संभाजीराजे रविवारी (दि.१४) दुपारी साडेबाराच्या सुमारास गजापूर येथे पोहोचले. पोलिसांनी त्यांनाही पुढे जाण्यास अटकाव केला. मात्र, काही झाले तरी गडावर जाणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली. यानंतर त्यांना चालत पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली. शेकडो शिवभक्तांसह सुमारे तीन किलोमीटर अंतर चालत जाऊन संभाजीराजे यांनी विशाळगडाच्या पायथ्यावर ठिय्या मारला. अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याखेरीज हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
संभाजीराजे गडावर गेल्याने पोलिस मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत गडावर गेले. याचाच फायदा घेत अनेक कार्यकर्ते गडावरून माघारी फिरले. गजापूरच्या दिशेने जातानाच वाटेत असणार्या मुसलमानवाडीला आंदोलकांनी लक्ष्य केले. विशाळगड आणि गजापूर अशा दोन्ही बाजूंनी आलेल्या आंदोलकांनी मुसलमानवाडीत दिसेल त्या घरे, दुकानांवर हल्ला चढवला. प्रचंड तोडफोड करत वाहने व घरातील साहित्यांची जाळपोळ सुरू केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या महिला, लहान मुले, नागरिक वाट दिसेल त्या दिशेने सैरभैर पळत सुटले. आंदोलक जे जे हाताला येईल, त्याची तोडफोड करत होते. पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्याने या ठिकाणी असणारे पोलिस आंदोलकापुढे अक्षरश: हतबल झाले होते. घटनेची माहिती मिळताच गडावरून पोलिस पुन्हा खाली आले, लाठीमार करत त्यांनी आंदोलकांना पांगवले. दरम्यान घरे, दुकानांची प्रचंड तोडफोड झाली होती. घरातील साहित्य, वाहने जाळण्यात आली होती. रस्त्यावरही मोठमोठे दगड, घरातील साहित्य टाकून मार्ग अडवण्यात आला होता.
दरम्यान, दुपारी साडेचारपर्यंत संभाजीराजे ठिय्या मारून बसले होते. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. काहीही झाले तरी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याखेरीज जागा सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. याबाबत कायदेशीर बाबी तपासून तत्काळ अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारी साडेचार वाजता संभाजीराजे यांनी आंदोलकांना परत जाण्याचे आवाहन केले.
रविवारी दुपारी चारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही तत्काळ कारवाई करू, उद्यापासून सुरुवात करू, असे आश्वासन दिल्याचे संभाजीराजे यांनी उपस्थितांना सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. आजवर अशाप्रकारे तत्काळ निर्णयच झाले नव्हते. आज फक्त शिवभक्तांमुळेच हे होऊ शकल्याचे संभाजीराजे सांगत असतानाच त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थितांतून तुम्ही रडू नका.