सांगली : पुढारी वृत्तसेवा
विशाळगड येथील दगडफेक करून समाजविघातक कृत्य करणार्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे करण्यात आली. कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात याबाबत बैठक घेण्यात आली.
याबाबत फुलारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगडावरच्या अतिक्रमणाबाबत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांनी गडावरील निरपराध मुस्लिम बांधवांना लक्ष्य करीत दगडफेक केली. तलवारीच्या धाकाने दमदाटी करत त्यांना मारहाण केली. यात लहान-थोर मंडळी जखमी झाली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, सुफियांन पठाण, इमरान बेग, मौलाना साहिल देशनुर, सिकंदर जमादार, काशिम मुलानी, हाफिजी असलम मुजावर (कागल), हाफिज मकतुम (हातकणंगले), अखलाक मुंशी (कोल्हापूर) आदी उपस्थित होते.