विशाळगड: गजापुरातील नुकसानग्रस्त कुटुंबाच्या परिस्थितीची खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.१६) पाहणी करून प्रापंचिक साहित्याची मदत केली. त्यांच्या व्यथा ऐकून शाहू महाराजही गहिवरले. भावुक होऊन मदत व मायेची ऊब दिली. त्यामुळे नुकसानग्रस्त भीतीच्या छायेतून काहीअंशी सावरले असले तरी वेदनेची सल त्यांना आजही टोचत आहे. उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबांना उभारी देण्यासाठी आता समाजातील दानशूर व्यक्तीच्या आर्थिक मदतीची गरज आहे.
रविवारी (दि. १४) विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागले. आणि गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापुरातील मुसलमानवाडीला अज्ञात आंदोलकर्त्यांनी वस्तीला टार्गेट करत घरांचे, गाड्यांचे, मशिदीचे, प्रापंचिक साहित्यांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. ऐन पावसात हा हल्ला झाल्याने जीवाच्या आकांताने वाट दिसेल तिकडे रहिवासी पळालेत. आणि आपला जीव वाचवला. तोडफोड शांत झाल्यानंतर वस्तीत येऊन पाहतात. तर घरात प्रापंचिक साहित्य इतरत्र विखुरलेले, चारचाकी-दोनचाकी वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक, घराला गळती, फुटलेली कौले, पत्रे, गॅस टाक्या, पाण्याच्या बॉटल आणि निवासाची गैरसोय पाहून अक्षरशः बालके, महिला, पुरुष मंडळी गळून पडली. जगणेच उद्ध्वस्त झाल्याने संसार सावरायचा कसा?, याची चिंता लागली होती. डोळ्यांचे अश्रू काही कमी होईनात, चिंता, भीती, मुलांचे शैक्षणिक नुकसान, आर्थिक नुकसान, घरांची उभारणी, त्याला लागणारा पैसा कोठून आणायचा या विवंचनेत येथील नुकसानग्रस्त आहेत.
आजही ही कुटूंबे सावरलेली नाहीत. त्यांच्या डोळ्यातील अश्रू तूटलेले नाही. या वस्तीतील कुटुंबाचा काडीमात्र अतिक्रमणाशी संबंध नसतानाही येथील कुटुंबांना मोठा आर्थिक, मानसिक फटका बसून कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. खासदार शाहू महाराजांना पाहताच येथील महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. शाहू महाराजही गहिवरले. प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाच्या घरात जाऊन पाहणी केली. रहिवाशांकडून सर्व परिस्थिती ऐकताना एका कुटुंबातील थंडीने गारठलेली चिमुकली पाहून शाहू छत्रपती यांचे मन गहिवरले. यावेळी शाहू महाराज भावूक झाले. त्यांनी आपल्या अंगातील कोट काढून त्या बालिकेच्या अंगावर घालून तिला तसेच जखमींची विचारपूस करून मायेची ऊब तर दिलीच शिवाय मोठा आधारही दिला आणि कोल्हापूर हे पुरोगामी शहर आहे. हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले.
आमचा काहीच संबंध नसताना मुस्लिम म्हणून आमची घरेदारे उद्ध्वस्त झाली. घरांची, गाड्यांची मोडतोड जाळपोळ करत हिंसाचार केला. अनेक संसार उघड्यावर आल्याने या वेदनेची सल मात्र प्रत्येकाला टोचत आहे. वरून धो-धो पाऊस असताना डोक्यावरील उडालेले छप्पर पाहून अनेक महिलांना अश्रू अनावर होत आहेत. त्यांना आता खऱ्या अर्थाने मायेची आणि आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांचा फाटका संसार पुन्हा उभारण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे.