पाचगाव : कळंबा (ता. करवीर) येथील ऐतिहासिक कात्यायनी देवी मंदिराचे लोखंडी गेट व लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी पाच किलो वजनाची प्रभावळ, देवीच्या लहान सात मूर्ती, चांदीच्या गंधाच्या डबीसह तीन लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
करवीर पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असून, मंदिर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली असून, अधिक तपास करवीर पोलिसांनी सुरू केला आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व ऐतिहासिक महत्त्व कात्यायनी देवी मंदिराला आहे. बालिंगा येथील राजू गुरव, वैभव गुरव, हृषीकेश गुरव हे मंदिराचे पुजारी आहेत. मंदिर परिसरातच ते कुटुंबासह राहतात. मंगळवारी पहाटे नेहमीप्रमाणे ते पूजेसाठी आले असता, मंदिरातील लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, देवीच्या गाभार्यातील नित्य पूजनातील संस्थानकालीन देवीच्या लहान सात मूर्ती व इतर ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.
पुजार्यांनी याची माहिती तत्काळ करवीर पोलिसांत तसेच बालिंगा येथील अध्यक्ष अमर जत्राटे, शिवाजी यादव यांना दिली. घटनेबाबत समजताच करवीर पोलिस किशोर शिंदे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. मंदिरातील मुख्य दरवाजा तसेच लाकडी दरवाजा व मुख्य गाभार्यातील लोखंडी दरवाजा, असे तीन दरवाजे तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने मंदिराच्या आवरातून मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला.