शिरढोण : बिरू व्हसपटे
तळकोकणात मुसळधार व कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात संततधार यामुळे पंचगंगा, वारणा व कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने संतत धार कायम ठेवल्यामुळे सोमवारी सकाळी पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. तर कृष्णेच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावे धास्तावली आहेत. पाणी वाढतंय की कमी होतंय यातच नागरिकांची घालमेल सुरू आहे. (Kolhapur Rain)
गत महापुराचा बसलेला फटका आणि मिळालेली तुटपुंजी मदत यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे महापूर येऊ नये यासाठी देवाला साकडं घातलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतल्याने पाणी पातळी कमी झाली होती. मात्र पावसाने पुन्हा जोर धरल्याने पाणी पातळी हळूहळू वाढत आहे. मात्र पावसाचा जोर असाच राहिला पुन्हा महापूर येण्याचा संकेत मिळत आहे. (Kolhapur Rain)
पंचगंगा नदीच्या पाण्यात हळुवार वाढ होत आहे. त्यामुळे काठावरील गावांना भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे. महापुराच्या धास्तीने शेकऱ्यांची नदीकाठावरील मोटारी काढण्याची लगबग वाढली आहे. पुन्हा महापूर आला तर हजारो हेक्टर शेती मधील पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. महापुराबाबत कर्नाटक व महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय असणे महत्वाचे आहे. (Kolhapur Rain)
"नेहमी अल्लमट्टीच्या विसर्गाबाबत शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे विसर्ग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी तातडीने बोलणे करणे सध्या गरजेचे आहे. विसर्गाची आकडेवारी सांगून पूरस्थिती हाताळता येईल असा प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक आमदार, खासदार यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी लोकांतून होत आहे. (Kolhapur Rain)
यावेळी दुर्दैवाने जर महापुराला लोकांना सामोरे जावे लागले तर याची सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे. कोणत्याही पातळीवर कर्नाटक प्रशासनाशी चर्चा केली नाही. शासनाने तातडीने कर्नाटक सरकारशी बोलणी करून महापूर रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा अन्यथा लोक यांना माफ करणार नाहीत.
-धनाजी चुडमुंगे आंदोलन अंकुश