कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पुराचे पाणी आले आहे. केर्ली येथे महामार्गावर पाणी आले आहे. अशाच पद्धतीने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास पुढच्या तासाभरात हा मार्ग वाहतूकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.
सध्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पाणी यायला सुरूवात झाली असून, वाहनधारक अशा पाण्यातून वाहने चालवत मार्गक्रमण करत आहेत. दरम्यान पुढच्या काही तासात पाणी असेच वाढत राहिल्यास प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक पूर्णत बंद करून अन्य मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल. दरम्यान पंचगंगेची पाणीपातळी 40.10 फुटांवर पोहोचली आहे.
पंचगंगा नदीची इशारा पातळी ही ३९ फूट इतकी आहे. तर धोका पातळी ४३ फूट आहे. मात्र सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ४०.१० फुटांवर पोहोचल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी कालच ओलांडलेली आहे. आता नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. आज पावसाचा जोर राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असून, आपत्तीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर ठेवली आहे. नदी शेजारील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.