इचलकरंजी;पुढारी वृत्तसेवा: 'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…' च्या जयघोषात आणि ऊन, पावसाच्या खेळात सोमवारी सकाळपासून घरगुती गणरायाच्या विसर्जनास प्रारंभ झाला. पंचगंगा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेकांनी कृत्रिम कुंडात विसर्जन करुन मूर्ती दान केल्या. तर अनेकांनी पारंपारिक पध्दतीने पंचगंगा नदीतच विसर्जन करुन बाप्पांना निरोप दिला.
पाच दिवसांपासून घरोघरी गणरायाची मनोभावे पूजाअर्चा केली जात होती. त्यामुळे घरामध्ये चैतन्य आणि आनंदाचे वातावरण होते. मात्र आज बाप्पांना नागरिकांनी जड अंत:करणाने निरोप दिला. सकाळपासूनच नदीघाटावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपारिक वाद्याच्या गजरात आणि पारंपारिक वेषभूषेत मोरया..चा अखंड जयघोष सुरू होता. सकाळी पावसाने काहीसा शिडकावा केला. त्यानंतर पुन्हा उघडीप पडली.
महापालिकेने विविध भागात आकर्षक सजावट करुन कृत्रिम कुंड उभे केले आहेत. त्याठिकाणी महापालिकेची यंत्रणाही सज्ज आहे. कृत्रिम कुंडात विसर्जनासाठीही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल, अप्पर तहसिलदार शरद पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पंचगंगा नदीला पर्याय म्हणून शहापूर खणीत गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाचे नियोजन करण्यात येत आहे. याहीवर्षी शहापूर खण परिसरात विसर्जनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. येथेही नागरिकांनी गणेशमुर्तींचे विसर्जन केले. विसर्जनाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.