

Kadvi Irrigation Project water storage
सुभाष पाटील
विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील परळे निनाई ते पाटणे दरम्यानच्या २२ गावांसाठी 'जीवनदायिनी' ठरलेल्या कडवी मध्यम प्रकल्पात यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. आजमितीला धरणात ५५.९९ टक्के साठा शिल्लक आहे. धरणातून २०० क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग कडवी नदीपात्रात सुरू आहे. धरण प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यावर्षी परिसरात पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली आहे.
कडवी धरणाची एकूण साठवण क्षमता २.५१ टीएमसी (७१.२४० दलघमी) असून सद्यस्थितीला त्यात १.४० टीएमसी (३९.५१ दलघमी) उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १.६२ टीएमसी साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत साठा किंचित कमी असला, तरी पावसाळ्यापर्यंतची गरज भागवण्यासाठी तो पुरेसा आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी ५९३.७९ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.
या प्रकल्पातून केवळ २२ गावेच नव्हे, तर मलकापूर नगरपालिका आणि उदय साखर कारखान्यालाही पाणीपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी दरमहा १० ते १२ टक्के पाणी लागते. वालूर, सुतारवाडी, येलूर, भोसलेवाडी, शिरगाव, कोपार्डे, पाटणे आणि सवते-सावर्डे या आठ ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणी साठवणूक अधिक प्रभावी झाली आहे. विशेष म्हणजे, आजवर या धरणातील साठा कधीही शून्यावर गेलेला नाही.
परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ळे, आळतूर, करूंगळे, वालूर, निळे, कडवे, येलूर, पेरीड, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव, सांबू, मोळवडे, सावर्डे, सवते, सावे, पाटणे आणि शिंपे.
एकूण क्षमता: २.५१ टीएमसी (७१.२४० दलघमी)
चालू पाणीसाठा: १.४० टीएमसी (३९.५१ दलघमी)
पाणी पातळी: ५९३.७९ मीटर
प्रकल्पातील पाणी पातळी सध्या समाधानकारक असली, तरी भविष्यातील गरजा लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करावा.
— खंडेराव गाडे, शाखा अभियंता, कडवी धरण