

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूरसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेली ३५ वर्षे जनतेचा लढा सुरु आहे. आता जनतेतून खंडपीठ मागणी जोर धरू लागली आहे.
शिवाजी पेठ (कोल्हापूर) येथील ओंकार फौंडेशन यांनी नवीन वर्षीचा संकल्प करून खंडपीठच्या मागणीबाबत जनतेतून पत्र व्यवहार मा. मुख्य न्यायमूर्ती यांना करण्याचे ठरविले. त्यानुसार "जनतेतून एक पत्र खंडपीठ करीता" या द्वारे जागृती केली. सर्वसामान्य जनता, ग्रामपंचायत, विविध संस्था, व्यवसायिक, तालीम मंडळ, सहकारी सोसायटी यांनी स्वयंस्फूर्तीने खंडपीठ मागणीचे लेखीपत्र लिहून दिले. काेल्हापूरमध्ये खंडपीठ स्थापन होणे गरजेचे आहे, अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्ती केली.
खंडपीठ मागणी संदर्भात जमा झालेली मोठ्या संख्येने पत्रे आज प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्हा न्यायालय येथे खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांच्याकडे जमा केली. यावेळी ओंकार फौंडेशनचे पदाधिकारी अध्यक्ष अमोल सरनाईक, उपाध्यक्ष विवेक वैजापूरकर यांनी खंडपीठ लढ्यासाठी आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे राहू, असे सांगितले.
यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. जनतेतून खंडपीठ मागणी जोर धरू लागल्याने मुख्य न्यायमूर्ती लवकरच खंडपीठ स्थापनेचा निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली. तसेच जमा झालेली सर्व लेखी पत्रे मा. मुख्य न्यायमूर्ती यांना पाठवण्यात येतील, असे सांगितले. यावेळी सचिव ॲड. ताटे-देशमुख यांनी ओंकार फौंडेशन पदाधिकारी यांचे कार्याबद्दल खंडपीठ कृती समितीतर्फे आभार मानले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, संदीप चौगले, जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल, ॲड. संकेत सावर्डेकर, ॲड. सुशांत चेंडके, ॲड. करणकुमार पाटील, ॲड. वारणा सोनवणे, ॲड. समीउल्ला पाटील,ॲड. गिरीश मोकाशी, ॲड. प्रसाद माळकर, ॲड. गिरीश मोकाशी, ॲड.निखिल पोवार, ॲड. . कुलदीप कोरगावकर, ॲड. सुधाकर पाटील, ॲड. तेजगोंड पाटील, ॲड. चारुलता चव्हाण, ॲड. शिल्पा सुतार आणि मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होते.
हेही वाचलं का?