नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे संपुर्ण जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या धरतीवर नृसिंहवाडी येथील प्रबुद्धनगरमधील प्लॉट, दत्त अपार्टमेंट, तसेच विविध भागातील सुमारे 60 कुटुंब पाणी वाढल्यामुळे शुक्रवारी (दि.26) स्थलांतरीत झाली आहेत.
दरम्यान मिठाई बाजारपेठेतील सुमारे पन्नासहून अधिक व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य हलविले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूल विभागाची महापूर नियोजनाच्या दृष्टीने संयुक्त बैठक शुक्रवारी (दि.26) विश्रामगृहात पार पडली. या धरतीवर सध्याच्या पाणी पातळीनुसार स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. आणखी स्थलांतर करावे लागल्यास तात्पुरत्या स्वरूपात दत्त हायस्कूल, जि. प. मराठी शाळेत करण्यात येणार आहे. महापुराची पातळी ओळखून पद्माराजे विद्यालय, दत्त कारखाना परिसरात स्थलांतर करण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयाशी संपर्क करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पुराचे पाणी धोका पातळीच्या पुढे गेल्यास यांत्रिक बोट, लाईफ जॅकेट, जीवरक्षक दल आदी व्यवस्थांची मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणार आहे. यावेळी सरपंच चित्रा सुतार म्हणाल्या, "नागरिकांनी आपत्तीस सतर्कता बाळगावी आणि सामोरे जावे." यावेळी उपसरपंच रमेश मोरे पूरग्रस्तांनी कोणतीही चिंता करु नये असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे, तलाठी राजू शिंदे, सदस्या मंगल खोत, पुनम जाधव, चेतन गवळी, तानाजी निकम, विद्या कांबळे, अनघा पुजारी, ग्रामसेवक बी. एन. टोने, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अनंत धनवडे, उपाध्यक्ष शशिकांत बड्डपुजारी, माजी ग्रा.पं. सदस्य विनोद पुजारी, कोतवाल महेश नाईक, मराठा नेते सागर धनवडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार, शिवराज जाधव, प्रितम साळुंखे आदी मुखमंडळी व नागरिक उपस्थित होते.