उंचगाव; पुढारी वृत्तसेवा : गांधीनगरसह रुकडी रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाडीचा थांबा सुरु करावा अशी मागणी मंगळवारी (दि. १६) करवीरमधील ठाकरे गटाकडून करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज टमर्निल, कोल्हापूर येथील रेल्वे अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देऊन लवकरात लवकर याचा पाठपुरावा न केल्यास रेल्वेरोको आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला.
या मागणीचे निवेदन ठाकरे गटाच्या करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा.आर. के. मेहता, रेल्वे स्टेशन प्रबंधक छत्रपती शाहू महाराज टमर्निल, कोल्हापूर यांना देण्यात आले. तसेच हे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री, भारत सरकार व इनचार्ज ऑफिसर, मिरज रेल्वे जंक्शन यांनाही ई मेल द्वारे देण्यात आले. ठाकरे गटाच्या शिवसेनेने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली असून गांधीनगर बाजारपेठेसाठी तेथील कामगार वर्गासाठी आणि व्यापारी वर्गासाठी प्रसंगी रेल्वेरोको आंदोलन करण्यात येईल. तत्पूर्वी याबाबत सारासार गांर्भीयाने विचार करुन गांधीनगर रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेससह सर्व रेल्वे गाड्या थांबवाव्यात तसे न झाल्यास रेल्वेरोको आंदोलन करण्याचा इशार ठाकरे गटाकडून देण्यात आला.
दरम्यान यावेळी बोलत असताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, गांधीनगर बाजारपेठेत येणाऱ्या व सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पंधरा हजारावर आहे. मिरज, हातकणंगले, निमशिरगांव, माणगांव, जयसिंगपूर, परिसरातील कर्मचारी बाजारपेठेत सेवा बजावतात. त्यांना एसटीतून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. जर मिरजहून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गांधीनगर रेल्वे स्टेशनवर थांबल्या तर या कर्मचाऱ्यांना अल्पदरात गांधीनगर बाजारपेठेत येता येईल. याशिवाय मिरज जंक्शनवरुन परराज्यातून येणारा व्यापारी वर्ग व ग्राहकांची सोय होईल, गेल्या कित्येक महिन्यापासून एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नसल्याने गांधीनगर बाजारपेठेमध्ये मंदीचे सावट दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील या अग्रगण्य बाजारपेठेला आधार देण्याची केंद्रसरकारची जबाबदारी असल्याचे यादव यावेळी म्हणाले.
केंद्रीय रेल्वे खात्याने गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबविल्या तर गांधीनगर बाजारपेठेला पुन्हा उर्जीत अवस्था येईल. वारंवार विविध पक्ष संघटनांनी रेल्वेकडे तक्रारी, निवेदने, आंदोलनाचे इशारे व आंदोलने करुनही रेल्वे प्रशासन या प्रश्नाकडे गांर्भीयाने पाहत नाही. त्यामुळे कामगार, व्यापारी वर्ग व ग्राहकांमध्ये रेल्वेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अशी प्रतिक्रिया देखील शिवसैनिकांनी दिली.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, गांधीनगर रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, बाबुराव पाटील, आबा जाधव, भगवान पंजवाणी, भगवानदास मनचुडीया, महेश माखिजा आदी उपस्थित होते.
हेही वाचा