कोल्हापूर : पुणे-बंगळूर मार्गावरील उंचगावचा पूल प्रश्न गंभीर; ठाकरे गटाचा महामार्ग प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : पुणे-बंगळूर मार्गावरील उंचगावचा पूल प्रश्न गंभीर; ठाकरे गटाचा महामार्ग प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा

उंचगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावरील उंचगावच्या माळीवाडा येथील पुलाच्या नुतणीकरण प्रश्नी शिवसेना-ठाकरे गटाने सोमवारी (दि. ४) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माळीवाडा येथील पुलाची लांबी, रुंदी आणि उंची वाढवण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा शिवसेना करवीर तालुका प्रमुख (ठाकरे गट) राजू यादव यांनी दिला.

सोमवारी (दि. ४) दुपारी उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, ठाकरे गटाचे नेते राजू यादव, पोपट दांगट, दिपक रेडेकर यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उजळाईवाडी येथील कार्यालयावर मोर्चा काढला. उंचगावच्या माळीवाडा जवळील पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुलाची लांबी, रुंदी आणि उंची वाढवत नुतणीकरण करण्याची मागणी केली. दरम्यान प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक गोविंद बैरवा आणि अभियंता सी. बी. भरडे यांना ठाकरे गटासह गावातील अन्य पदाधिकारी व नेत्यांनी पुलाच्या नुतकणीकरणाविषयी निवेदन दिले. सहापदरीकरण कामादरम्यान पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच ग्रामस्थांसाठी हा पर्यायी मोठा मार्ग असल्याने या गंभीर समस्येला दुर्लक्ष केल्यास आंदोलन करु असा इशाराही ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला.

शिवसेना (ठाकरे गट) करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ साली या महामार्गाचे काम दोनपदरी झाले होते. २०१२ ला चारपदरी व आता २०२३ ला साताऱ्यापासून ते कागलपर्यंत रस्त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. यापूर्वी उंचगाव व तावडे हॉटेल रस्त्याच्या पुलाची उंची कमी ठेवल्याने उंचगावकरांना तावडे हॉटेलपासून शेतामध्ये जाण्यासाठी, मणेरमाळकडे मुख्य महामार्ग ओलांडून पुलाखालून जाणे ही गंभीर बाब झाली आहे. दोन्हीही पुलाखाली वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. नागरिकांनी या वाहतुकीच्या कोंडीचा नाहक त्रास सहन केला. गंभीर रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता पुन्हा नवीन सहा पदरीकरणात हा त्रास उचगावकर सहन करू शकणार नाहीत असेही यादव यावेळी म्हणाले.

ज्या चुका पूर्वी विस्तारीकरणावेळी झाल्या त्या आता आम्ही होऊ देणार नाही. पूर्वीच्या चुकांच्या वेदना १० ते १५ वर्ष उंचगावकर सहन करत आहेत. आता सहापदरीकरण करताना माळीवाडा पुलाची उंची व रूंदी वाढवण्याबाबत संबंधित प्रशासन उदासीन असुन त्या पुलाची उंची वाढवणार नसल्याचे समजते. एकतर संपूर्ण रस्ता उंचगावमधून जात असल्याने प्रामुख्याने उंचगावच्या ५० ते ६० हजार लोकवस्तीच्या गावातील माळीवाडा पूल ज्या पूलापलीकडे शेकडो एकर शेती व त्या शेतामध्ये जाणारा शेकडो शेतकरी, कष्टकरी वर्ग आपल्या मालाची ने-आण कशी करतील? शेतकऱ्यांचे मुख्य पीक ऊस आहे. माळीवाडा पुलाखालून ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जात नाही. उंचगावमधील गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी गणेश विसर्जनासाठी जाणारी गणेश मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्या पुलाखालून जात नाही. अशा गंभीर समस्या असल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले. – राजू यादव

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, विक्रम चौगुले, राहुल गिरुले, सुनील चौगुले,योगेश लोहार, विराग करी, वैभव पाटील, संजय चौगुले, भूषण कदम, सूरज पाटील, संतोष पाटील, आनंदा माने, चंदर जाखले, नारायण मनाडे, अवि मोळे, काका पाटील, केरबा माने, कैलास जाधव, शरद माळी, अजित चव्हाण, सचिन नागटीळक, दत्ता यादव, बाळासो मनाडे, विश्वास यादव, शफीक देवळे, पांडू भोसले, राजू संकपाळ, दत्ता फराकटे, मंगू वळकुंजे, धनाजी पाटील, परशुराम म्हाकवे, सुधीर जाखले, सोमनाथ तोडकर, अजित पाटील आदींसह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button