प्रयाग चिखली : पुढारी वृत्तसेवा
पुराच्या पाण्याने रस्त्याच्या बाजूपट्टया खराब झाल्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील रेडे डोह ते केर्ले गावापर्यंतचा प्रवास धोकादायक बनला आहे. तातडीने रस्त्याच्या बाजूपट्ट्या दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
दरवर्षी पुरात खराब होणाऱ्या या रस्ताचा दर्जा कायमस्वरुपी सुधारणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शिवाजी पूल ते केर्ले गावादरम्यान महामार्गावर साधारण तीन फूट पाणी पसरले होते. पाणी तीन दिवस रस्त्यावर असल्यामुळे रस्ता तसेच रस्त्याच्या बाजूपट्ट्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.
या ठिकाणच्या बाजूपट्ट्या वाहून जाऊन दुरवस्था झाली आहे. विभागाकडून महामार्ग महामागीच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्या भक्कम भरून घेणे अपेक्षित असताना अक्षरशः खर माती टाकून तकलादूपणे बाजूपट्ट्या गुळगुळीत केल्या होत्या.
पाऊस लागल्यावर या बाजूपट्ट्या निसरड्या बनल्या होत्या. त्याचा प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता. आता तर बाजूपट्ट्याच वाहन गेल्या आहेत.