

कवठेगुलंद : औरवाड (ता. शिरोळ) काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, औरवाड आणि नरसोबाची वाडी या गावांना जोडणारा जुना पूल आज पाण्याखाली गेला आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वाहतूक नवीन पुलावरून वळवली
हा जुना पूल पाण्याखाली गेल्यामुळे औरवाड सह कृष्णा नदीपलीकडील सात गावचा परिसराचा नरसोबाची वाडीशी असणारा थेट संपर्क आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक नवीन पुलावरून वळवली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नद्यांची पाणी पातळी अशीच वाढत राहिल्यास परिसरातील पिके आणि सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यकतेनुसार स्थलांतराची तयारीही ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाचे आवाहन
"नदीकाठच्या गावांनी आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे. पाण्याच्या प्रवाहात कोणीही उतरण्याचा किंवा सेल्फी काढण्याचा जीवघेणा स्टंट करू नये. पूरस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष आहे."