रेंदाळ (कोल्हापूर) पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर राज्यभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक मंडळाचे मंडप सजले आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वर्षीही जंगमवाडी (ता. हातकणंगले) गावाने 30 वर्षांपासूनची एक गाव एक गणपती परंपरा अखंड जपली आहे.
जंगमवाडी हे सुमारे १५०० लोकवस्ती असलेले महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एक गाव आहे. गावात गेल्या तीस वर्षांपासून एक गाव एक गणपती उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला जातो. गावातील प्रत्येक मंडळाला पाच वर्षे रोटेशन पद्धतीने संधी दिली जाते. आज अखेर शासनाच्या नियमांशी बांधील राहून उत्सव साजरा केला जातो. आतापर्यंत मंडळांनी गावामध्ये अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गेल्या चार वर्षांपासून दोस्ती बॉईज मंडळानेही मंडप सजावट व सामाजिक उपक्रम राबवून उत्सवाला आकर्षक स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
प्रशासनाकडून गणराया अवॉर्ड दिले जातात पण अशा आदर्शवत उपक्रमाची प्रशासन दरबारी दखल घेतली जात नाही. प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची शाबासकी आवश्यक असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. उत्सव साजरा करण्यासाठी ओंकार खोत, सुनील बंने, सोमशेखर खोत, विवेकानंद हारगे, सुरज परकाळे, स्वप्नील जांभळे यांच्यासह गावातील तरूण परिश्रम घेत असतात.
हेही वाचा :