![कोल्हापूर : हॉटेल व्यावसायिकाचे वीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; पाच लाख दिल्यानंतर सुटका](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2F%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : टोप संभापूर येथील एका हॉटेल व्यावसायिकाचे आठ ते दहा जणांच्या टोळीने जबरदस्तीने अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी वीस लाखाची खंडणी मागितल्याची घटना घडली. यापैकी पाच लाख मिळाल्यानंतर व्यावसायिकास सोडल्याची खळबळजनक घटना शिरोली एमआयडीसी परिसरात घडली. हॉटेल मालकाच्या वडिलांनी पोलीस मुख्यालयात याबद्दलची तक्रार दिली. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागावचे सादिक मुल्लाणी यांचे टोप येथे हॉटेल आहे. दि. १७ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता मुल्लाणी यांचे अपहरण करण्यात आले. खंडणीखोरांनी त्यांच्या सुटकेसाठी वीस लाखाची खंडणी मागितली. सादिक यांचे वडील रेहमान यांनी दि. १८ जानेवारीला पाच लाख टोप येथील बँक खात्यात जमा केले. त्यानंतर रात्री उशिरा सादिकला खंडणीखोरांनी सोडून दिले.
रेहमान मुल्लाणी यांनी दि. १९ जानेवारीला जिल्हा मुख्यालयात याबाबत तक्रार दिली. शुक्रवारी (दि.२०) सकाळी शिरोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात खंडणीतील पाच लाख टोपच्या फेडरल बँकेतून काढले आहेत. व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून हे अपहरण झाले, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा;