शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा: शाश्वत विकास परिषदेत फौंडी अँड इंजिनिअरिंग 'हब' म्हणून कोल्हापूरची घोषणा करण्यात आली. या हबमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. उद्योजकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे. यामुळे भविष्यात या तिन्ही जिल्ह्यात मोठे उद्योग येऊन विकासाला चालना मिळेल, अशी माहिती शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे ( स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनेक वर्षांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा फौंड्री हब म्हणून घोषित करावा, याकरिता जिल्ह्यातील उद्योजक व औद्योगिक संघटना प्रयत्नशील होत्या. कोल्हापूर येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा व महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाश्वत विकास परिषदेचे आयोजन २५ जूनरोजी केले होते. यावेळी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. हबची घोषणा कोल्हापूरसह सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासातील एक माईल्ड स्टोन ठरणार आहे. तर यामुळे वस्त्रोद्योगच्या धर्तीवर वीज दर आणि व्याजामध्ये सवलत मिळणार आहे.
सुरेंद्र जैन म्हणाले की, भारतामध्ये सध्या फौंड्रीची तीन क्षेत्रे आहेत. यामध्ये तामिळनाडूमधील कोईमतूर, गुजरातमधील राजकोट आणि महाराष्ट्रमधील कोल्हापूर या तिन्ही राज्यात कोल्हापूर अग्रेसर आहे. भारतामध्ये चायना प्लस हे धोरण आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फौंड़ी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात जागतिक स्तरातून कोल्हापूरमध्ये गुंतवणूक यावी, हा मुख्य हेतू आहे. फौंड्री हबमुळे नोकऱ्या आणि लहान उद्योगांची वाढ होऊन विकासाला चालना मिळणार आहे. माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्न (कृषी) प्रक्रिया या बरोबरच मोठे उद्योग जिल्ह्यात आणणे, परदेशी गुंतवणूक वाढवणे, इलेक्ट्रिकल व्हेईकल, डिफेन्समधील उत्पादन वाढवणे आदी उद्दिष्टे समोर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस 'मॅक'चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे आयआयएफचे खजानिस अभिषेक सोनी, स्मॅकचे खजानिस बदाम पाटील, निमंत्रित सदस्य संजय भगत, दीपक घोंगडी, अनिल दटमजगे, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.