जीवघेणी ईर्ष्या...प्रत्येक डायलॉगमधून उद्ध्वस्त करण्याची आणि अस्तित्वच संपविण्याची भाषा... मती गुंग करणारा पराकोटीचा हिंसाचार... अंगाचा थरकाप उडविणारा रक्तरंजित संघर्ष... हे सारं तुम्ही विविध ओटीटी (ओवर-द-टॉप) प्लेटफॉर्मवरील वेब सीरीजमधून पाहात आला असाल. 'ओटीटी'ला सेन्सॉर बोर्डची कात्री नाही, त्यामुळेच मिर्झापूर सारख्या वेब सीरीजमधून हिंसाचाराचा पूर वाहतोय, असा सूर सूजाण प्रेक्षकांमधून उमटतो. हे झाले अभासी पडद्यावरील चित्र;पण मागील काही महिन्यांमध्ये भरदिवसा आणि भररस्त्यात असा रक्तरंजित संघर्ष कोल्हापूरकर वास्तवात उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात पूर्ववैमनस्याबरोबरच टोळीयुद्धातून दिवसाढवळ्या नागरी वस्तीत मुडदे पाडले जात आहेत. शहरात खाकी वर्दीचा धाक नेमका कोणाला आहे? असा भाभडा प्रश्न सर्वसामान्य कोल्हापूरकर स्वत:लाच विचारत आहेत. (Kolhapur Crime)
४ एप्रिल २०२४ : अजय दगडू शिंदे ऊर्फ रावण (वय 35, रा. यादवनगर) या तरुणाचा परिसरातील तरुणाबरोबर भांडण झालं होतं. ते मिटविण्यासाठी त्याला रंकाळा टॉवरजवळ चौपाटीजवळ बोलविवण्यात आले. त्यानुसार अजय शिंदे हा आकाश शिंदे व अन्य काही मित्रासोबत तेथे गेला. अजय शिंदे तेथे दिसताच चार ते पाच हल्लेखोर तरुण हातात कोयता, एडका घेऊन धावतच अजय शिंदेच्या दिशेने आले. यावेळी अजय धावत सुटला. (Kolhapur Crime)
हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला रंकाळा चौपाटीवर गाठत त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अजय शिंदे हा खाली कोसळला. त्याचा साथीदार आकाशवरही हल्ला केला. तो थोडा बाजूला जाऊन पडला.हल्लेखोरांनी अजयवर एका पाठोपाठ एक सपासप वार करायला सुरुवात केली. डोक्यात, हातावर, पाठीवर सपासप वार झाल्याने तो जागीच ठार झाला. अजय गतप्राण झाल्यानंतरही हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते. हल्लेखोर एका चारचाकी गाडीतून आले होते. ती गाडी घटनास्थळी ठेवूनच हल्लेखोरांनी पळ काढला. शेकडो लोकांच्या समोर घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.
यादवनगरातील अजय शिंदे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावरही मारामारीसह अन्य काही गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल होते. यादवनगरातील अनेक गुन्हेगारांचे गट आहेत. यामध्ये वारंवार संघर्ष उद्भवत आहेत. सततच्या या प्रकारामुळे अनेक तरुण मुले या गटा-गटात विभागली आहेत. त्यामुळे सतत संघर्ष होतो. त्यामुळे पोलिसांसमोर येथील गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान आहे.
१३ जून २०२४ : टोळीयुद्धातून पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार सुजल बाबासो कांबळे (19, रा. वारे वसाहत) याचा तलवार, एडक्याने सपासप वार करून निर्घृण खूनकरण्यात आला. टिंबर मार्केट ते जोशीनगर झोपडपट्टी रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ शहाजी वसाहत येथे हा थरारक प्रकार घडला होता. रंकाळ्यासारख्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणीही एका गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात पुन्हा भरदिवसा असाच थरारक प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. Kolhapur Crime)
राजेंद्रनगरमधील कुमार गायकवाड या गुन्हेगाराची शहरातील टाकाळा उड्डाणपूल येथे निर्घृण हत्या झाली. त्या खुनातील आरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच सुजल कांबळे याचा खून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. राजेंद्रनगरात काही दिवसांपूर्वी मोटरसायकलींची तोडफोड करण्यात आली होती. तसेच काही घरांचे नुकसान केले होते. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. रील्सचे व्हिडीओ करून एकमेकांना आव्हानेही दिली जात होती. त्यामुळे खून का बदला खून की, रील्सच्या खुन्नसमधून सुजलचा खून झाला, हे स्पष्ट आहे.
सुजल कांबळे व त्याच्या मित्रांचा सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. तसेच रोहित जाधव यानेही काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त व आव्हान देणार्या रील्समुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून पोलिसी हिसका दाखविला होता. त्यानंतरही रील्समधून एकमेकांना आव्हाने देणे सुरूच होते. रील्सच्या खुन्नसमधूनच सुजलचा खून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तब्येत दणकट असल्याने मित्रांमध्ये पैलवान अशी सुजलची ओळख होती. (Kolhapur Crime)
शहरात भरदिवसा होणार्या खुनाची चर्चा काय असतानाच. मंगळवार, २ जुलै २०२४ रोजी दुपारी भररस्त्यातील खुनाने कोल्हापूर पुन्हा एकदा हादरले. राजारामपुरी परिसता कनान नगर भागात राहणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला. 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला..!' जणू एखाद्या मोठ्या टेन्शनमधून बाहेर पडल्यासारखे खुनातील संशयित आरोपीचे हे वक्तव्य ऐकून पोलिसही अवाक् झाले. पंकज भोसले याच्यावर खुनी हल्ल्यानंतर घटनास्थळीच अटक केलेल्या संशयिताला राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आमचा गेम करण्यापूर्वीच त्याचा काटा काढला असे सांगून निर्दयी मनोमन आनंद व्यक्त करत होता. तीन सख्या भावांसह चौघांनी पंकजच्या छाताडावर बसून अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून त्याला जाग्यावरच संपविले. एखाद्या वेबसीरजलाही लाजवेल असा सुमारे १० मिनिटे हा रक्तरंजित थरार सुरू होता.
राजारामपुरीत खून झालेला मृत पंकज व संशयित आरोपी किशोर ऊर्फ नीलेश विक्रम काटे, गणेश विक्रम काटे, उमेश विक्रम काटे, अमित गायकवाड आदी सर्वजण कोल्हापूर शहरातील कनाननगरमध्येच राहतात. पंकज व काटे बंधूंनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. २०१९ मध्ये गणेश काटे याचे एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध होते. प्रेम प्रकरणातून गणेश व संबंधित विवाहिता पळून गेले होते. त्यातूनच पंकज भोसले व काटे कुटुंबात वादाची ठिणगी पडली होती. या रागातून पंकजने दोन साथीदारांच्या मदतीने उमेश काटे याच्यावर सशस्त्र हल्ला चढविला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा पंकज भोसले व काटे यांच्यातील वैर टोकाला गेले होते. एकमेकांवर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने बघून घेण्याच्या धमक्या सुरूच होत्या. २०१८ व २०१९ मध्ये त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.
पंकजने नीलेश, गणेश व उमेश या तिघांना तुम्हाला सोडणार नाही... एकेकाला संपविणार असल्याची धमकी दिली होती. पंकजचा स्वभाव पाहता कोणत्याही क्षणी तो हल्ला करून ठार मारू शकतो, अशी भीती काटे बंधूंना होती. त्यामुळे काटे बंधू टेन्शनमध्ये होते. अखेर त्यांनी पंकजचा काटा काढण्याचा कट रचला.. त्यानुसार नीलेश, गणेश, उमेश व अमित यांनी मंगळवारी दारु ढोसली. मद्यधुंद अवस्थेत ते पंकजला शोधू लागले. राजारामपुरीतील घरात पंकज मिळाला नाही. त्यामुळे 'पंक्या आज वाचलास..' असे म्हणून तेथून बाहेर पडले. रस्त्यावरून चालत जात असतानाच चारचाकीतून पंकज येताना त्यांना दिसला. त्यामुळे पुन्हा ते परत आले. तेथेच त्यांनी 'लई घाईला आलायर्स... तुला आता संपविल्याशिवाय सोडत नाही...' असे म्हणून हल्ला केला.
गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात गुंडाराज असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या नागरी वस्तीत खून होत आहेत. पूर्ववैमनस्याबरोबरच टोळीयुद्धातून मुडदे पाडले जात आहेत. शहरातील गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांच्या भीतीऐवजी गुंडांची दहशत निर्माण होत आहे. २०२३ मध्ये जिल्ह्यात ४८ खून झाले, तर २०२४ मध्ये गेल्या सहा महिन्यांत २७ जणांचे मुडदे पाडले गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहर व जिल्ह्यात पोलिस आहेत की नाहीत, अशी विचारणा नागरिकांतून केली जात आहे.