बिद्री: पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणार्या सरकार व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ बिद्री (ता. कागल) येथे सर्व मराठा समाज व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गारगोटी-कोल्हापूर मार्गावर दोन स्वतंत्र्य आंदोलने करण्यात आली. यावेळी सरकारचा निषेध करीत आंदोलकांनी गारगोटी-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवाध्यक्ष अजित पोवार, डॉ. विनायक जगदाळे, स्वाभिमानीचे ओंकार चव्हाण, आनंदा वरुटे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.
आंदोलनात माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, धनाजी फराकटे, आर. आर. पाटील, निवास फराकटे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष निखिल परीट, सागर सूर्यवंशी, उदय चव्हाण, अनिल मगदूम, सोन्या मगदूम, सतीश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुरगूड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
बिद्री येथे कागल तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ही रास्ता रोको करून निषेध करण्यात आला. यावेळी वंचित आघाडीच्यावतीने सरकारच्या निषेधाचे निवेदन मुरगूड पोलिसांना देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, तालुकाध्यक्ष धनाजी सेनापतीकर, राज कांबळे, महादेव कांबळे यांची भाषणे झाली. आंदोलनात सुरेश डाकरे, उत्तम कांबळे, तुषार कांबळे, अतुल कांबळे, महेश कांबळे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जालना येथे झालेल्या लाठी हल्ल्याचा टायर पेटवून म्हाकवे येथे सरकारचा व पोलिसांचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवराम चौगुले, पंढरीनाथ पाटील, रघुनाथ पाटील, सरपंच सुनीता चौगुले, सुनील देवडकर, विकास पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण माळी, नितीन पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा