राशिवडे; प्रवीण ढोणे : राधानगरी तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांमधील सर्व दूरध्वनी बंद असल्यामुळे लोकांना थेट भेट घेण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. राधानगरी पोलीस ठाणे, महसुल, पंचायत समिती हे प्रमुख संपर्क विभागच जनसंपर्कात नसल्याने तालुक्यातील आपतकालीन व्यवस्थाच संकटात सापडल्याचे स्पष्ट होत आहे.
राधानगरी तालुका तसा डोंगराळ आणि दुर्गमच, पावसाचा भडीमार मात्र जोरातच असतो. ९० टक्के लोकवस्ती ही पूर्वकडे आणि तालुक्याचे ठिकाण पश्चिमेकडे अशी भौगोलिक रचना आहे. परिणामी लोकांना शासकीय कामासाठी ५० ते ७० कि.मी. चे अंतर यावे लागते. यामध्ये वेळ आणि अर्थिक ताण सोसावा लागतो, अशावेळी संबधित कार्यालयांशी फोन करुन जाणे सोयीचे ठरते. अपघात, खून, मारामारी, महापूर, संकट, आपत्कालीन घटना घडल्यास दूरध्वनीवरुन तातडीने माहीती दिली जाते. परंतु गेल्या वर्षभराभरापासून पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंदच आहे. तर तहसिल कार्यालय, पं.स, आरोग्य विभाग, एस.टी.आगार, सार्वजनिक बांधकाम, वनविभागाचे दूरध्वनी केवळ टेबलाची शोभा वाढविण्याचेच काम करत आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील तर दूरध्वनी कित्येक दिवसांपासून बंद आहेत. तालुक्यामध्ये स्थापन केलेल्या आपत्कालीन समितीशीही संपर्क साधणे आता जिकरीचे बनले आहे. त्यामुळे आपत्कालीन घटनेंचा सर्व ताण १०० व १०१ नंबरवर पडत आहे.
प्रामुख्याने राधानगरी तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थेलाच संकटातुन बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीसह अन्य व्यवस्था पुरविणे गरजेचे आहे. तरच आपत्कालीन व्यवस्था खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करेल अन्यथा सोयीअभावी गैरसोयीचा भार सोसत आपत्कालीन समितीला काम करावे लागेल.
हेही वाचा :