कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर शहरातील पूर कमी होण्यास सुरवात झाली असली तरी अनेक रस्ते बंद असल्याने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या होत्या. आता सोमवारी (दि.२९) कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी रात्री काढले. शिरोळ तालुक्यातील नऊ शाळांत निवारा केंद्र सुरू केल्याने या शाळांनाही सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील अनेक मार्गावर अद्याप पाणी आहे. शहरासह करवीर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवणे उचित होईल, असा अहवाल करवीरचे प्रांताधिकारी हरीष धार्मिक यांनी दिला होता. त्यानूसार जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नूसार करवीर तालुक्यातील आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रासह सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी घोषित केली आहे.
शिरोळ तालुक्यातील श्री. दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरूंदवाड, तेरवाड आश्रमशाळा ,एस.पी. हायस्कूल, कुरुंदवाड , एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड , चंद्रकला बालक मंदिर, कुरुंदवाड, सैनिकी पॅटर्न शाळा, कुरुंदवाड , कुमार विद्या मंदिर, जि.प. शाळा अकिवाट, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, तेरवाड, जिल्हा परिषद विद्यामंदिर, धरणगुत्ती या नऊ शाळांत पूरबाधीत नागरीकांसाठी निवारा केंद्र तयार केले आहे. यामुळे या शाळाही सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहेत.
सोमवारी कोल्हापूर शहर, करवीर तालुका आणि शिरोळ मधील नऊ शाळा-महाविद्यालयांना सुट्टी दिली असली तरी या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात स्पष्ट केले आहे.