

Kolhapur Jawan Death Arunachal Pradesh
सरवडे: सुळंबी (ता. राधानगरी) गावचा सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) हवालदार सागर शंकर पाटील (वय ४३) यांचा अरुणाचल प्रदेश पालम येथील १३८ बटालियन येथे सेवा बजावत असताना गुरुवारी (दि.९) रात्री अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात दुधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत अखेरची मानवंदना देऊन साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. त्याच्या चित्तेला मुलगी अनया हिने भडाग्नी दिला. त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशांनी जनसमुदाय अक्षरशः हेलावून गेला होता.
देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसरासह तालुका शोकमग्न झाला होता.अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना अपघाती निधन झालेल्या सागर पाटील यांचे पार्थिव गुवाहाटीमार्गे पुणे येथे आणल्यानंतर सकाळी सुळंबी गावात दाखल झाले.जवान पाटील यांचे पार्थिव गावात पोहोचताच वातावरण शोकमग्न झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर “शहीद सागर पाटील अमर रहे” व “भारत माता की जय” चा जयघोष होता.
सुळंबीच्या मातीचा हा वीर सुपुत्र गावात परतला, मात्र जिवंत नव्हे तर तिरंग्यात लपेटलेला… हा क्षण प्रत्येकासाठी हृदय पिळवटून टाकणारा ठरला.हजारोंच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते.संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला, तर दुसरीकडे दुःखाचा गहिवरही प्रत्येकाच्या मनात होता.
शासकीय इतमामात, वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, मुलगी कु अनया व कु. ईशा पाटील, भाऊ राजेंद्र पाटील, बहीण सारीका केंडे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, रणधीर मोरे, पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, पोलिस पाटील संतोष पाटील, नायब तहसीलदार प्रशांत ढगे, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, माजी सैनिक संघटनेतर्फे कॅप्टन तानाजी खाडे, सीआरपीएफ पोलीस निरीक्षक विशाल चंद्रा यांनी पुषचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अनेक मान्यवरांनी मनोगतातून जवान पाटील यांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी सीआरपीएफ जवानांची तुकडी, राधानगरी पोलीस, यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी युनिट,विद्या मंदिर सुळंबी,सोळांकूर हायस्कूल , किसनराव मोरे व शिवाजीराव खोराटे हायस्कूल सरवडे या विद्यार्थ्यांनी गर्दीवर नियंत्रण करत पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.सीआरपीएफच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली.
अंत्ययात्रेत उपस्थित प्रत्येकाने अश्रूपूर्ण डोळ्यांनी आपल्या वीराला अखेरचा सलाम केला.२२ वर्षे देशाच्या विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या या जवानाने आपल्या शौर्याने आणि निष्ठेने देशसेवेचा आदर्श घालून दिला.
यावेळी अरुण जाधव, नेताजीराव पाटील,सुरेशराव चौगले,मनोज फराक्टे, सुर्यकांत पाटील, नंदकिशोर सुर्यवंशी, जे के पाटील, जयवंत पाडळकर, विलास पाटील, फत्तेसिंग पाटील, चंद्रकांत चौगले व सुळंबीसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.