

Monsoon Damage to Crops Kolhapur Rain Impact
खोची: उन्हाचा तडाखा सोसून खूप कष्ट केले. टपोऱ्या दाण्याचे मोती पिकविले. पण अवकाळी पावसानं स्वप्न मातीमोल केलं. ना उपयोग... ना मोल. अशी अवस्था खोची परिसरातील उभ्या असणाऱ्या ज्वारी पिकाची झाली आहे. याचा फटका थेट उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे. पिकाची नासाडी होत असल्याने भविष्यात ज्वारीचे दर वाढणार. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकाला बसणार. तर जनावरांनाही चाऱ्याला मुकावे लागणार आहे.
मागील काही दिवसापासून सलग पडणाऱ्या पावसाच्या जोरदार संततधारेने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. काढणी मळणी ठप्प झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तमा न बाळगता उभ्या पावसात काढणी मळणी केली. त्यांची ज्वारी काळी पडली आहे. तर कडबा शेतातच कुजू लागला आहे.
काही शेतकऱ्यांनी पावसाचे पाहून रौद्ररूप पाहून काढणी मळणी पुढे ढकलली. पावसाचा जोर काही ओसरला नाही. त्यामुळे संपूर्ण शेतात पाणी साठले. याचवेळी शेतात वाऱ्यावर डोलणाऱ्या कणसाला पावसामुळे कोंब फुटू लागले आहेत. या कोंबाकडे पाहून शेतकऱ्याचे त्राण गळून गेले आहेत. डोळ्यातून आसवं टिपू लागली आहेत. आगामी वर्षाचे भविष्य अंधकारमय दिसू लागले आहे.
कोंब फुटलेली ज्वारी उपयोगात येत नाही. त्याचा जनावराना चारा म्हणूनही उपयोग नाही.तर अशी ज्वारी व्यापारी खरेदी सुद्धा करत नाहीत. त्यामुळे ज्वारीचे काय करायचे ? हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.शेतात साठलेले पाणी कमी झाल्याशिवाय पिकाची काढणी होऊ शकत नाही. उत्पादन काहीच पदरात पडत नाही.तर काढणीचा खर्च शेतकऱ्याच्या अंगावर बसणार आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.