पुढारी ऑनलाईन डेस्क: विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमिताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून, घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे, असे म्हणत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी या घटनेचा निषेध करत नाराजी देखील व्यक्त केली आहे. (Vishalgad Encroachment)
यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु, राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. राज्य सरकारने रविवारी अतिक्रमण करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, असही खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.
माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव निषेध करतो. हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. उद्या (मंगळवारी) आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत.
कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, असेही ते म्हणाले. विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी, त्या संदभीत कोणताही दुजाभाव केला जाऊ नये, असे देखील खासदार श्रीमंत शाहू छत्रपतींनी प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.