राशिवडे: भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आरोप प्रत्यारोपांचा धुरळा निघत आहे. बहुतांशी सभासद मात्र शेतीकामात मग्न आहेत. राधानगरी आणी करवीर तालुक्यातील ५८ गावांमधील २७ हजार १६५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. कार्यक्षेत्रातील ५८ गावांपैकी निम्याहुन अधिक मतदार संख्या असणाऱ्या 'त्या' १५ गावांवरच सतेचे भवितव्य ठरणार आहे. या गावांवर तिन्ही आघाडींच्या नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. प्रतिष्ठेच्या लढाईत सत्तेची खुर्ची कुणाकडे जाणार? याचा फैसला हीच गावे करणार आहेत.
सतारुढ आमदार पी. एन. पाटील गटाशी राष्ट्रवादीचे ए.वाय. पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी आघाडी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, हंबीरराव पाटील, जालंदर पाटील, अजित पाटील यांची भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानीची शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीही रिंगणात आहे. तर माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक कै. दादासाहेब पाटील कौलवकर पॅनेलच्या माध्यमातून तिसरी आघाडी रिंगणात आहे.
दिवाळी सणामुळे थोडाफार प्रचार थंडावला होता पण आता मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना सोशल मीडियासह प्रचार सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुर निघत आहे. कारखान्यावर असणारे कर्ज, सभासद साखर, नोकरभरती, खरेदी, साखर चोरी आदी बाबींवर पातळी सोडून आरोप केले जात आहेत. राधानगरी तालुक्यातील ३५ गावांमध्ये१४ हजार ३५५ तर करवीर तालुक्यातील १२ हजार ८१० मतदार आहेत.
तर संस्था गटाचे ४९५ मतदार आहेत. प्रामुख्याने राशिवडे बु, ठिकपुर्ली, कुरुकली, परिते, सडोली खा, बाचणी, घोटवडे, कौलव, गुडाळ, शिरगाव, हळदी, कोथळी, बेले, म्हाळुंगे, वाशी या गावांमध्ये मतदानाची संख्या जास्त आहे. त्यामुळे हीच गावे भोगावतीच्या सतेची खुर्ची कुणाला द्यायची? यासाठी ही गावेच किंगमेकर ठरणार आहेत.
राशिवडे बु, गावामध्ये चार, ठिकपुर्ली, कौलव, घोटवडे, कोथळी, कुरुकली, परिते, सडोली खा गावामध्ये प्रत्येकी ३ तर आवळी बु, येळवडे, पुंगाव, शिरगाव, हळदी, बेले, म्हाळुंगे, वाशी, कांडगाव, देवाळे, कुर्डू, आरे, बाचणी, हसुर, म्हालसवडे गावांमध्ये प्रत्येकी २ तर उर्वरित गावांमध्ये एक याप्रमाणे मतदान केंद्रे असणार आहेत.
हेही वाचा