

प्रा.शाम पाटील
मुदाळतिट्टा : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने राज्यातील ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत’ १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील ५४ बसस्थानकांना एकूण ३ कोटी रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त, दि. १ जून रोजी मुंबई येथे या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाला’ राज्यभरातील बसस्थानकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामुळे स्वच्छता, सुशोभीकरण, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
सन २०२५-२६ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ‘अ’ वर्गात पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने ९७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ‘ब’ वर्गात भंडारा विभागातील लाखणी बसस्थानकाने ९७ गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले, तर ‘क’ वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बसस्थानकाने ९८ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
प्रादेशिक विभागनिहाय निकालात छत्रपती संभाजीनगर विभागातील औरसा नवीन, मुंबई विभागातील रत्नागिरी, नागपूर विभागातील चंद्रपूर, पुणे विभागातील बारामती, नाशिक विभागातील सटाणा आणि अमरावती विभागातील उमरखेड या बसस्थानकांनी आपल्या-आपल्या विभागात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या अभियानामुळे बसस्थानक परिसरातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधा, सुशोभीकरण, स्वच्छतागृहांची देखभाल, हरित उपक्रम तसेच कर्मचारी सहभाग या सर्व बाबींमध्ये सकारात्मक बदल घडून आला आहे. अनेक बसस्थानकांनी स्थानिक स्तरावर अभिनव उपक्रम राबवून प्रवाशांसाठी आकर्षक, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण निर्माण केले आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचा आदर्श इतरांनीही घ्यावा ; परीवहन मंत्री
“स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक ही केवळ स्पर्धा नसून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याची व्यापक चळवळ आहे. राज्यातील प्रत्येक बसस्थानक आदर्श, स्वच्छ आणि प्रवासीहितैषी व्हावे, या उद्देशाने हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे मत परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. या अभियानामुळे एसटीच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडून येत असून प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. स्वच्छता, गुणवत्ता आणि सेवाभाव यांच्या या स्पर्धेमुळे राज्यातील बसस्थानके आता नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने ही कामगिरी अजितदादांच्या कल्पक, दूरदर्शी आणि कार्यक्षम कार्यशैलीला वाहिलेली आदरांजली असल्याचेही ते म्हणाले.