मुंबई : महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे. महाराष्ट्राकडे भविष्याची स्वप्ने असून औद्योगिक, शेती, आर्थिक क्षेत्राची शक्ती आहे. याच शक्तीने मुंबईला देशाचे आर्थिक हब बनवले आहे. याच शक्तीच्या जोरावर आता महाराष्ट्राला जगाचे शक्तिकेंद्र बनविणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईत केली.
मुंबईलाही देशातील आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाची राजधानी बनविणार असल्याचा आशावादही मोदींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या पंतप्रधानपदाची तिसर्यांदा शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यादांच मुंबईत आले. गोरेगाव येथील नेस्को संकुलात मोदींच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे विविध 29 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रारंभ, भूमिपूजन, पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पण असे कार्यक्रम पार पडले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उपनगराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह महायुतीचे खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधानांना शाल, फेटा व छत्रपती शिवाजी महाराज व बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याचे प्रतिकृती भेट स्वरूपात दिले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मोदी बोलत होते.
भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी ‘महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींना माझा नमस्कार’, अशी मराठीतून साद घालताच उपस्थितांमधून जोरदार टाळ्यांचा गजर झाला. मोदी म्हणाले, आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी तीस हजार कोटींच्या प्रकल्पासाठी भूमिपूजन आणि लोकार्पणाची संधी मिळाली. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. यात रस्ते आणि रेल्वेव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नवतरुणांना कौशल्य विकासासाठी खूप मोठी योजनाही समाविष्ट आहे. यातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. मुंबई गतिमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. विकसित भारतात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. उद्योग, कृषी, पर्यटन, पर्यावरण आदी क्षेत्रात महाराष्ट्रात आर्थिक बलशाली बनवण्याचा मानस आहे. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास व शक्तिशाली वर्तमान आहे. राज्याला समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या शौर्याचे किल्ले साक्षी आहेत. सह्याद्रीच्या रांगा आणि कोकणातील अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात भारतातील नंबर एकचे राज्य बनवण्याचे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले. देशात विकासाची नवीन गाथा लिहिण्याचे काम महाराष्ट्र करत असून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, असे सांगताना महाराष्ट्राला जागतिक आर्थिक शक्तिकेंद्र बनवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
एक महिन्यापासून मुंबई देश-विदेश गुंतवणूकदारांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी एनडीए सरकारच्या तिसर्या टर्मचे स्वागत केले आहे, असे सांगतानाच एनडीएचे सरकार देशात स्थैर्य देऊ शकते हे माहीत असल्यानेच लोकांनी आम्हाला तिसर्यांदा संधी दिली आहे. त्यामुळे तिसर्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीनपटीने अधिक काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. कौशल्य विकासासाठी योजना राबवल्या जात आहेत. प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे ध्येय आहे. महाराष्ट्रात मोठी रोजगाराची संधी त्यामुळे निर्माण होईल. दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रातील वाढवण बंदराला मान्यता दिली. 76 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून दहा लाखांपेक्षा अधिक नवीन रोजगार निर्मिती होणार आहे, असे मोदी म्हणाले.
21 व्या शतकात भारताच्या आकांक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी उत्तम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेवर येताच अटल सेतू महामार्गाचे काम पूर्णत्वास आले. याचा मोठा फायदा होत आहे. परंतु विरोधकांनी त्यावरून अपप्रचार सुरू केला. आज याच मार्गावरून दररोज 20 हजार गाड्यांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे दररोज सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे इंधन बचत होते, असे मोदी यांनी सांगितले. मुंबईत 10 वर्षांपूर्वी 8 किलोमीटर मेट्रोची कामे सुरू होती. आता 80 किलोमीटरपर्यंत कामे पूर्ण झाली आहेत; तर 200 किलोमीटर मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मजबूत बनवत आहोत. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. विरोधक मात्र त्याबाबत अपप्रचार पसरवत आहेत. अपप्रचार करणारे विरोधक विकासकामाचे शत्रू आहेत, असा सणसणीत टोला मोदींनी लगावला.
गेल्या दहा वर्षांत चार कोटी गरीब जनतेला पक्की घरे दिली. तीन करोड गरिबांना लवकरच घरे मिळतील, असा दावा पंतप्रधानांनी केला. रस्त्यावरील जनतेचे जीवन सुसह्य व्हावे हे सरकारचे धोरण आहे. तसेच फेरीवाल्यांसाठी स्वयंकर्ज योजना आणली आहे. 90 लाख कोटीच्या कर्जाची तरतूद केली. त्यापैकी महाराष्ट्रात 13 लाख कोटी निधीचे वितरण केले आहे. अनेकजण योजनेचा लाभ घेत आहेत. काहींनी कर्ज घेऊन रक्कमसुद्धा फेडल्याचे मोदींनी सांगितले.