Raju Shetty Protest |… तर कोल्हापूरच्या हद्दीतील उसाचे कांडे तोडू देणार नाही; राजू शेट्टींचा सांगलीतील कारखान्यांना निर्वाणीचा इशारा   | पुढारी

Raju Shetty Protest |... तर कोल्हापूरच्या हद्दीतील उसाचे कांडे तोडू देणार नाही; राजू शेट्टींचा सांगलीतील कारखान्यांना निर्वाणीचा इशारा  

सरूड : पुढारी वृत्तसेवा :  शिरोली (कोल्हापूर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील चक्काजाम आंदोलनातून सर्वमान्य झालेला ऊसदाराचा तोडगा सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनाही मान्य करावाच लागेल, अन्यथा त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून एकही ऊसाचे कांडे तोडू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानीचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना दिला आहे. यासाठी आज शुक्रवारी (ता. २४) दुपारी सांगलीत होणाऱ्या पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. (Raju Shetty Protest)

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसदरासाठी गेले दोन महिने विविध मार्गाने आंदोलन सुरू असताना सर्वपक्षीय साखर कारखान्यांनी हे आंदोलन बेदखल केले होते. राज्य सरकारची देखील त्यांना साथ मिळाल्यामुळे नाईलाजाने राष्ट्रीय महामार्गावरील चक्काजाम आंदोलनाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढावे लागले. याला आंदोलन अंकुश सारख्या संघटनांचे बळ आणि शेतकऱ्यांनी दाखविलेली एकजूट यामुळे वेगवेगळ्या पातळीवर झालेल्या बैठकीत मग्रुरीची भाषा करणारे साखर कारखान्यांचे प्रतिनिधी अखेर नरमले. मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला एकही रुपया देता येणार नाही असा फुत्कार काढणाऱ्यांनी स्वाभिमानीने १०० रुपयांचा दिलेला प्रस्ताव कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या साक्षीने स्वीकारला आहे. (Raju Shetty Protest)

दरम्यान, महामार्गावरील चक्काजाम आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी कारखानदारांच्या एकीलाच आव्हान दिल्याने ऊसदराची कोंडी फुटली. मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचे १०० रुपये दोन महिन्यांत भागविणे आणि यंदाचा ऊसदर एफआरपी अधिक १०० रुपये एकत्रित देणे, हा तोडगा निघून आंदोलनाचा शेवट गोड झाला. असे वाटत असताना आंदोलनस्थळी उपस्थित सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांशी संलग्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ‘आमच्यावरील अन्यायचे काय?’ असा सूर आळवत काहीशी अस्वस्थता व्यक्त केली. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी तुम्हाला असे एकाकी पडणार नाहीत, असा दिलासा आपण सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला असून शनिवारी (ता.२५) आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजाराम साखर कारखान्यावर आंदोलन सुरू करणार आहे. यासाठी कोल्हापुरचा ठरलेला तोडगा सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनाही लवकरच मान्य करावा लागेल. अन्यथा त्यांना शेतकऱ्यांच्या एल्गाराला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

 Raju Shetty Protest … तर त्या कारखान्यांचे नाक दाबणार

दरम्यान, स्वाभिमानीने वेळोवेळी ऊसदारासाठी केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन कारखानदारांनी माघारीचे सोंग घेत बऱ्याचदा शेतकऱ्यांना ठेंगा दाखविल्याचा इतिहास विसरता येत नाही. याच पार्श्वभूमीवर उद्या कारखान्यांकडून इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी स्वाभिमानीने पुरेपूर दक्षता घेतली आहे. ठरलेला तोडगा मोडणाऱ्या, झुगारणाऱ्या साखर कारखान्यांच्या अंगणात शेतकऱ्यांसोबत बेमुदत ठिय्या आंदोलन करून त्यांचे नाक दाबून दमछाक करणार आहे. अशा ‘आर या पार’ निर्धाराने शेतकरी आंदोलनाची पुढीची दिशाच राजू शेट्टी यांनी दै. पुढारीशी बोलताना स्पष्ट केली आहे.

हेही वाचा 

Back to top button