कोल्हापूर : पंचगंगेची पाणीपातळी स्थिर; सकाळी ४०.४ फूट

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. आज (मंगळवार) सकाळीही शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे पाउस जरी कमी झाला असला, तरी नद्यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ सुरूच आहे. पंचगंगेने सोमवारी पहाटे इशारा पातळी ओलांडली. आता तिची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने सुरू आहे. आज (मंगळवार) सकाळी पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४०.०५ इंचावर स्थिर आहे. दरम्यान रात्री बारा वाजल्यापासून पाणी पातळीत कोणताही बदल नाही.
राजाराम बंधारा येथे इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. त्यामुळे आज दिवसभरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली तर, राधानगरी धरण उद्यापर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यातच नदी खोऱ्यात पावसाचा जोर वाढला तर पंचगंगा नदी ४३ फूटाची धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी किणाऱ्यावरील नागरि वस्तींना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत.
राधानगरी धरण सोमवारी रात्री 91 टक्के भरले आहे. आज (मंगळवार) धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून, त्यातून विसर्ग सुरू झाला तर कोल्हापुरला महापुराचा धोका आहे. 83 बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत.
हेही वाचा :