P. N. Patil: काळम्मावाडी धरणाच्या दुरूस्तीसाठी निधी द्या : पी. एन. पाटील यांची विधानसभेत मागणी | पुढारी

P. N. Patil: काळम्मावाडी धरणाच्या दुरूस्तीसाठी निधी द्या : पी. एन. पाटील यांची विधानसभेत मागणी

कौलव, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता . त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला आहे. या धरणाला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार पी.एन. पाटील (P. N. Patil) यांनी आज (दि.२४) विधानसभेत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता २८ टीएमसी असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी प्रतिसेकंद ६५० लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढण्यात येणार आहे. यासाठी ८४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगून काही अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र, पावसाला उशीर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. जनतेला प्यायला ही पाणी मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या वर्षभरात या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही. (P. N. Patil)

शाहू जयंतीदिवशी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मी पाणी टंचाई का निर्माण झाली? असा प्रश्न उपस्थित केला असता या कामासाठी टेंडरच मंजूर झाले नसून ८४ कोटींचे पुन्हा टेंडर काढणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी पुन्हा या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. या धरणाला धोका आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती लवकर होणार काय? याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे व तातडीने निधी मंजूर करून निविदा काढावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button