

: 'भेटी लागे जीवा…लागलीसे आस…' अशा भक्तिमय वातावरणात शाहूवाडी तालुक्यातून निघालेल्या माऊलीच्या पालख्या, दिंड्याने अवघ जनजीवन माऊलींमय झाले आहे. सर्वत्र भक्तीचा मळा पहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मनात साक्षात माऊलीच आपल्या गावात, दारात आलेत, अशीच श्रध्दा निर्माण झाली आहे. 'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' अशा भावूक वातावरणाने नागरिक (Ashadhi Wari 2023) भारावले आहेत.
आषाढाची (Ashadhi Wari 2023) चाहूल लागली की, वारकऱ्यांना ओढ लागते, ती पांडुरंगाच्या दर्शनाची. कानाकोपऱ्यातून वारकरी, विठ्ठल भक्त संतांच्या दिंडीमध्ये सहभागी होत महिनाभराचा पायी प्रवास करत आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात दाखल होतात. शाहूवाडी तालुक्यातील अनेक मार्गावरून दिंड्यांचा प्रवास पंढरीच्या दिशेने होत आहे. दिंडीतून टाळ, मृदुंगाचा होणारा गजर आणि रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, च्या जयघोषाने रस्ते दुमदुमत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनाच्या ओढीने मार्गक्रमण करत असलेल्या विविध संतांच्या दिंड्याने वातावरण भक्तिमय बनले आहे.
प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडून पालखी, दिंडी सोहळ्याचे वाजत गाजत स्वागत, वारकऱ्यांचे मनोभावे आदरातिथ्य होत आहे. गावकऱ्यांकडून वारकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था, भोजन, नाश्ता, चहापाण्याची खास व्यवस्था केली जात आहे. दिंडीच्या मुक्कामी परिसर स्वच्छता, विजेची व्यवस्था करून वारकऱ्यांना कसल्याही बाबीची कमतरता जाणवू नये, यासाठी ग्रामस्थ चोखपणे भूमिका पार पाडत आहे. दिंडीतून होणारा हरिनामाचा जयघोष अन् टाळ, मृदंगाचा गजर यामुळे भक्तिमय वातावरण बनले आहे.
दरम्यान, पाऊस लांबल्याने महामार्गावरील गावामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असले तरी दिंडीतील वारकऱ्यांची तहान प्रत्येक गावातील ग्रामस्थांकडून भागविली जात आहे. वारकऱ्यांचे आदरातिथ्य, व्यवस्था करण्याचे काम ग्रामस्थांकडून चोखपणे पार पडले जात आहे.
हेही वाचा