कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस लावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार हा निंदनीय व निषेधार्ह आहे. अशा प्रवृत्तीचे कदापी समर्थन केले नाही. अशा विकृतींना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन कुरुंदवाड शहर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांना देण्यात आले. (Kolhapur News)
निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागात सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. राष्ट्र पुरुषांचा अनादार करणारे आणि नको त्या व्यक्तींचे उदात्तीकरण करणारे आक्षेपार्ह मजकूर अथवा फोटोचे स्टेटस् लावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. अशा प्रवृत्तींचा निषेध असून या समाजकंटकांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. चार दिवसांपूर्वी असाच प्रकार कोल्हापूरात घडला. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत असून जिल्ह्यातील सामाजिक शांतता व एकात्मता अबाधित रहाणे गरजेचे आहे.
कोल्हापूर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची भूमी आहे. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना कोणताही भेदभाव न करता न्याय देण्याचे काम केले आहे. अशा भूमीत जर कोणी आक्षेपार्ह स्टेटस्च्या माध्यमातून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे आणि ते करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मिरासाहेब पाथरवट, अशपाक हुक्कीरे, भोला बारगीर, अल्ताफ बागवान, सरफराज जमादार, सलीम बागवान, अल्ली पठाण, इकबाल पटवेगार, असलम जमादार आदी समाजबांधव उपस्थित होते.
हेही वाचा