खासदार धैर्यशील माने स्टंटबाजी करून श्रेय लाटताहेत: राजू शेट्टी यांची टीका | पुढारी

खासदार धैर्यशील माने स्टंटबाजी करून श्रेय लाटताहेत: राजू शेट्टी यांची टीका

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी-कोल्हापूर व अर्जुनवाड-मिरज या मार्गावर असलेल्या रेल्वेमार्गावर २०१८ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नातून उड्डाणपूल मंजूर करून आणला. यापैकी इचलकरंजी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले असून विद्यमान खासदार धैर्यशील माने हे समर्थकांमार्फत स्टंटबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

राजू शेट्टी म्हणाले की, २००९ साली मी लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीपासून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. २०१८ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वरील दोन्ही कामांना मंजूरी दिली. त्यानंतर २०१९ साली या कामाची निविदा प्रसिध्द होवून कामास सुरवात झाले. महारेल कंपनीकडून सदर काम करत असताना याबाबत हलगर्जीपणा झाला. याबाबत वारंवार संबधित अधिकारी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून सदर कंपनीकडून काम करून घेण्यात आले.

धैर्यशील माने यांच्या कुटुंबात जवळपास ४० वर्षे खासदारकी आहे. या ४० वर्षाच्या कारकिर्दीत यांना त्यांच्या जन्मगाव असलेल्या रूकडी गावात रेल्वे उड्डाणपूल व रूकडी -चिंचवाड पंचगंगा नदीवर पूल बांधणे शक्य झाले नाही. यामुळे स्टंटबाजी करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न माने कुटुंबियांनी करू नये, असा सल्ला शेट्टी यांनी दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button