

कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करणार्या मनपाच्या सफाई कामगार महिला देवदूत ठरल्या आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्या रोज सत्त्वपरीक्षा देत आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात जेथे अन्य नागरिकांना पाय ठेवण्यास बंदी असते, त्याच भागाला सुरक्षित ठेवण्याचे काम महिला सफाई कर्मचारी पार पाडत आहेत. केवळ तोंडाला मास्क लावून हातात हँडग्लोव्हज असो वा नसो, ही मंडळी अविरत कार्यरत आहे. ऊन-पावसाच्या झळा सोसत रोज 8 ते 10 तास ही मंडळी काम करत आहेत. स्वच्छतेच्या व्रतापासून परावृत्त न होण्याचा निर्धार त्या व्यक्त करतात.
कोरोना वैश्विक संकटात परिसर स्वच्छ ठेवण्याच्या द़ृष्टिकोनातून अखंडपणे सेवा देण्याचे काम स्वच्छतादूत महिला करताहेत. आरोग्यसंवर्धन आणि नागरिकांची काळजी हे प्रथम कर्तव्य समजून त्यांची धडपड आजही सुरू आहे. खालच्या दर्जाचे काम करण्याची कोणाची मानसिकता नसते. मात्र, सफाई, झाडू आणि आरोग्य विभागाकडील कामगार हेच काम तन्मयतेने करतात. सकाळी सहाला हजेरी लावली की दिवस सुरू होता. झाडू कामगार रस्त्यावर खराटा घेऊन उतरतात.
सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालयांची साफसफाई तर जोखमीचे काम; मात्र हाती बादली आणि खराटा घेऊन त्या स्वच्छतेचे काम करतात. शहराच्या आरोग्यसेवेशी असे दोन हजार झाडू आणि सफाई कामगार जोडले गेले आहेत, त्यामध्ये बहुतांश महिला कर्मचारी आहेत. त्यांच्यामुळे आपली घरे व सार्वजनिक रस्तेही स्वच्छ राहतात.
रस्त्यावरील कचरा एकत्रित गोळा केला जातो. घरोघरचा कचरा सायकल गाड्यांत एकत्रित केला जातो. सायकल पुढे ढकलून चांगलीच दमछाक होते. गळ्यातील शिटी वाजल्यानंतर 'कचरा…' असा आवाज आला की, कचरेवाला आपल्या दारात आल्याची जाणीव होते. कोंडाळ्यात हा कचरा टाकला जातो. तेथून महापालिकेची यंत्रणा कंटेनरमधून हा कचरा झूमच्या दिशेने हलविते. शहर असो की उपनगर, सकाळपासून कामगारांची धावपळ सुरू असते. सॅनिटरी इन्स्पेक्टरपासून सगळेच सहापासून रस्त्यावर असतात. सध्याच्या संकट काळात इतरांच्या आरोग्यासाठी झटणार्या या महिलांना नव्हे नवदुर्गांच्या रूपांना सलाम!