कोल्हापूर: 'राजाराम' निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी ५२ अर्जांची विक्री; एक अर्ज दाखल
कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ५२ अर्जांची विक्री झाली. मात्र, मंगळवारी अनुसुचित जाती जमाती गटातून बाळासो नाना कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. अमावस्या असल्याने बहुतांश इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती.
बुधवारी गुढी पाडव्याची सुट्टी आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय तथा निवडणूक कार्यालयात गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बॅरिकेट बांधून गटनिहाय अर्ज दाखल करण्याची विभागणी करण्यात आली आहे, कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी पहिल्याच दिवशी तब्बल २१६ अर्जांची विक्री झाली होती, तर १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी मात्र ५२ अर्जांची विक्री झाली आणि दिवसभरात केवळ एक अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान दोन दिवसांत २६८ अर्जांची विक्री झाली. पण एकूण १८ अर्ज दाखल झाल्यामुळे गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा