कोल्हापूर: सत्तरीत बांधली रेशीमगाठ ! घोसरवाड जानकी वृद्धाश्रमात अनोखा विवाह सोहळा | पुढारी

कोल्हापूर: सत्तरीत बांधली रेशीमगाठ ! घोसरवाड जानकी वृद्धाश्रमात अनोखा विवाह सोहळा

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून त्यांने तिला प्रपोज केलं. तिनेही त्याला होकार दिला आणि वयाच्या सत्तरीत त्यांनी रेशीमगाठ बांधून आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. ही कोणती काल्पनिक कहाणी नाही किंवा ही गोष्ट कॉलेज तरुण-तरुणीची नाही तर ही प्रेम कहाणी आहे. ७५ वर्षीय बाबुराव आणि ७० वर्षीय अनुसया यांची.

व्हॅलेंटाईन डेला केले प्रपोज

घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील ही लग्नाची गोष्ट सर्वांनाच नक्कीच विचार करावयास लावणारी आहे. १४ फेब्रुवारीला आश्रमातील मंडळी ‘रोटी डे’ साजरा करायला अन्य ठिकाणी गेलेली असताना बाबुराव यांनी या दिवसाचे औचित्य साधून चक्क अनुसया यांना प्रपोज केले. व्हॅलेंटाईन डे ला प्रपोज केले आणि अवघ्या पंधरा दिवसांच्या आतच त्यांचे लग्न लागले.

दोघेही होते पोरके

घोसरवाड येथे बाबासाहेब पुजारी हे गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धाश्रम चालवतात. याच जानकी वृद्धाश्रमात बाबुराव पाटील (वय ७५, मूळ गाव शिवनाकवाडी, ता. शिरोळ) हे दीड वर्षापूर्वी आले. तर अनुसया शिंदे (वय ७०, मूळ गाव वाघोली, जि. पुणे) या सहा ते सात वर्षांपूर्वी आल्या. बाबुराव यांच्या पत्नीचे निधन होऊन सुमारे २२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. अनुसया या आपल्या पती समवेत सहा ते सात वर्षांपूर्वी येथे आल्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे आश्रमातच वृद्धापकाळाने निधन झाले.

विचार अन् मनेही जुळली

जोडीदार गेल्याने त्या खचल्या. उदास राहू लागल्या. याच वृद्धाश्रमात राहणारे बाबुराव यांच्या निदर्शनास ही बाब आली. सुखदुःखाची देवाणघेवाण करणाऱ्या या वयात बाबुराव आणि अनुसया यांचे विचार जुळले. कुठून तरी अनुसया या आनंदी राहतात हेच महत्त्वाचे होते. त्या कधी दुःखी दिसल्या की आश्रमाचे व्यवस्थापन करणारी मंडळी अहो कशाला दुःखी होता. तुमचा दोस्त आहे, त्यांच्याबरोबर बोलत बसा की असे म्हटले की त्या लाजायच्या. असेच दिवस जात होते.

बाबासाहेब पुजारींनी दिली भक्कम साथ

वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी दोघांशीही बोलून तुम्ही लग्नाला तयार आहात का, असे विचारले? दोघांकडून संमती मिळताच याबाबत लिहूनही घेतले. कष्टाचे वय नसल्याने आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने लग्न झाले, तरी शेवटपर्यंत वृद्धाश्रमातच राहून जीवन जगायचे हेही त्यांच्याकडून लिहून घेतले. दोघांनीही आनंदाने ही बाब मान्य केली आणि लग्नाची तयारी सुरू झाली. मणीमंगळसूत्र आणले. मंडप घालण्यात आला. शिरा भाताचे जेवण करून रितसर लग्न लावून देण्यात आले.

जानकी वृध्दाश्रममध्ये एकमेकांचा आम्हाला आधार झाला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हक्काचा जोडीदार असावा, अशी आमची भावना होती. त्यातूनच आम्ही लग्नाचा प्रस्ताव दिला. वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी तो मान्य करुन त्यांनी आमचे लग्न लावून दिले.
– बाबुराव पाटील, वर

हेही वाचा 

Back to top button