Kolhapur : राजाराम कारखान्याच्या अपात्र सभासदांंचा सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा; श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडाच्या अपात्र १३४६ सभासदांपैकी ७०९ सभासदांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, याची अंतिम सुनावणी आज बुधवार दि. ४ जानेवारी रोजी होणार आहे.
कारखान्याच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर कार्यालयाकडून “ब” वर्ग संस्था सभासद यादी सादर करण्याबाबत कारखाना चेअरमन / कार्यकारी संचालक यांना १४ नोव्हेंबरला कळवले होते. पण त्याचवेळी अपात्र सभासदांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. आता ४ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याचे समजते.
अपात्र सभासदांंची याचिका फेटाळून लावली होती
सात तालुक्यातील १२२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी दिला होता. यातील काही अपात्र सभासदांच्या वतीने या निर्णयाविरोधात तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मार्च २०२० मध्ये अपील दाखल केले होते. सहकार मंत्री यांनी गुरुवार दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सदरचे सभासद अपात्रच असल्याचा निर्णय दिला होता. सहकार मंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात अपात्र सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांचेसमोर याबाबतची सविस्तर सुनावणी होऊन त्यांनी अपात्र सभासदांंची याचिका फेटाळून लावली होती.
हेही वाचा