चंदगड: पुढारी वृत्तसेवा : जेलुगडेत एका टस्कर हत्तीने शुक्रवारी (दि.२१) रात्रभर धुमाकूळ घातला. बैलगाडी सुमारे शंभर फूट फरफटत नेली. यात बैलगाडीचे नुकसान झाले आहे. तर काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे जेलुगडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवार रात्री रात्रभर या टस्कराने भात, नाचणी, ऊस पिकांमध्ये धुडगूस घातला. बाळकृष्ण दळवी यांच्या पोल्ट्री समोरील लोखंडी बैलगाडी फरफटत नेली. गुंडू लक्ष्मण प्रधान यांच्या नाचणीच्या पिकात नेऊन गाडी पुर्णतः मोडल्यानंतरच टस्कर जंगलात निघून गेला. गावानजीक घडलेल्या या प्रकाराने घबराट पसरली आहे.
सुगी हंगाम पावसामुळे लांबला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची होणारी धूळधाण पाहून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रू येत आहेत. गवे, हत्तींचा मुक्काम वाढला असल्याने शेतकऱ्यांनी रात्री पिकांची रखवाली करणे सोडून दिले आहे. हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनेचा पंचनामा वनविभागाने केला.
हेही वाचलंत का ?