कागल नरबळी? : अपत्य प्राप्तीसाठी डॉक्टर मित्राच्या मुलाचा गळा चिरून खून? | पुढारी

कागल नरबळी? : अपत्य प्राप्तीसाठी डॉक्टर मित्राच्या मुलाचा गळा चिरून खून?

मुरगुड; पुढारी वृत्तसेवा : पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अपत्य प्राप्तीसाठी विकृत मित्रानेच आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या सात वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

ही भयंकर आणि अंगावर शहारे आणणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रकमध्ये घडली. वरद रवींद्र पाटील (वय ७, रा. सोनाळी, ता. कागल) असे या निष्पाप मुलाचे नाव आहे. या प्रकारानंतर सोनाळी गावात संतापाची लाट उसळली आहे.

वरदच्या वडिलांच्या मित्रानेच केला घात

वरदच्या वडिलांच्या मित्रानेच अपत्यप्राप्तीसाठी बळी दिल्याचा संशय आहे. पण पोलिसांनी खुनाचे कारण स्पष्ट केलेले नाही. या घटनेनंतर सोनाळीमध्ये (ता. कागल) प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, संशयित आरोपी मारुती तुकाराम वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथून मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आजोबांच्या घरातून अपहरण करण्यात आलेल्या सात वर्षीय शाळकरी मुलाचा अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

आजोबा दत्तात्रेय शंकर महातूगडे (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल) यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावर्डे बुद्रुक येथील गाव तलावात मुलाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त

खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे. आजोबा दत्तात्रेय मातूगडे यांनी सावर्डे बुद्रुक येथे नवीन घर बांधले आहे. घराच्या वास्तुशांतीसाठी डॉक्टर रवींद्र पाटील त्यांच्या पत्नी व मुलगा वरद सावर्डे बुद्रुक येथे गेले होते. दिवसभर घरातील सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वरद रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गायब झाला.

वडील आणि नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला. पण वरद सापडला नाही. मुरगूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मुरगूड कागल पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात व कर्नाटकातही मुलाचा शोध घेतला. पण त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह गाव तलावात आढळून आला.

त्याच्या अंगावर जखमांचे व्रण आहेत. त्यामुळे अमानुष मारहाण करून मुलाचा खून करण्यात आला असावा तसेच यामागे नरबळीचा प्रकार असावा अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती. या प्रकारामुळे कागल तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

हे ही वाचलं का? 

Back to top button