शेवटी गाढव परवडले! | पुढारी

शेवटी गाढव परवडले!

कौलव; राजेंद्र दा. पाटील : वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गाढवांची संख्या रोडावत असली तरी विविध कष्टाच्या कामासाठी गाढवांची मागणी वाढली आहे. डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने यांत्रिक पद्धतीने वाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे वीटभट्टीवर गाढवांना मागणी वाढत आहे. एका गाढवापोटी दिवसाला तीनशे रुपये मजुरी दिली जाते. दिवसभर त्याच्या पाठीवरून विटा व मातीची वाहतूक केली जाते. त्यामुळे गाढवाच्या मालकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. एका मालकाकडे किमान आठ ते दहा गाढवे असतात. ऑक्टोबरनंतर मे महिन्यापर्यंत वीटभट्टीवर त्यांना चांगली मागणी आहे. सांगली, सोलापूर, विजापूर जिल्ह्यातील मजूर गाढवासह कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर काम करत आहेत.

  • धक्कादायक! रूकडीत २८ वर्षे धनगर कुटुंबांवर बहिष्कार, ‘ती’ने घरातच खड्डा खणून पतीचे केले अंत्यसंस्कारसातत्याने उपेक्षेचा धनी बनलेल्या गाढवांचा भाव वधारला आहे. गाढव हा तसा भटका प्राणी असल्याने रस्त्याच्या कडेने अथवा रानावनात कुठे मिळेल तो पालापाचोळा खाऊन जगतो. त्यामुळे त्याच्या पालनपोषणाचा खर्च नाममात्र असतो. महाराष्ट्रात पंढरपूर, जेजुरी, जयसिंगपूर, सांगोला व मढी तसेच कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात काही अंशी गाढवांचा वावर आढळतो. जेजुरी व मढी येथील गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. बर्‍याच प्रमाणात गाढवांची आंध्र प्रदेशात विक्री केली जाते. घरोघरी मिक्सर ग्राइंडरचा जमाना आल्याने पाटे-वरवंटे तयार करणार्‍या बेलदार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हिरावला आहे. सध्या केवळ वीटभट्टीवरच गाढवांचा वापर होत आहे.

पूर्वी एका गाढवाची किंमत बारा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत होती. गाढवांचा वापर वाढल्याने हीच किंमत तीस हजारपर्यंत गेली आहे. यांत्रिकीकरण महागल्याने नेहमीच उपेक्षेचा धनी बनलेल्या गाढवाला मात्र चांगली किंमत आली आहे. मध्यंतरीच्या काळात गाढवांचा वापर कमी झाला होता. मात्र आता वीटभट्टीच्या कामासाठी गाढवांना मागणी वाढली आहे. त्यामुळे गाढवाच्या किमती वाढल्या असून आम्हाला रोजगार उपलब्ध होत आहे. शासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत गाढव संवर्धन मोहीम राबवावी.
— विकास जाधव, पंढरपूर

Back to top button