

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू असताना शाहू महाराज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. यावर आता संभाजीराजे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करुन पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही."
शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज घराण्याचा अपमान केलेला नाही. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी मुख्यमंत्र्यांनी यू-टर्न घेतलेला नाही, असे मत शाहू महाराज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले हाेते.
शाहू महाराज म्हणाले की, "संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहायचे होते. यासंदर्भात त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांनाही भेटणे गरजेचे होते. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही भेटले पाहिजे होते. सेना आणि संभाजीराजेंमध्ये झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता. भाजपने दिलेली खासदारकीलाही संभाजीराजेंचा विरोध होता".
यावेळी शाहू महाराज म्हणाले की, संभाजीराजे यांनी 2009 नंतरवेगळी वाट पकडली. राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी घेण्याबद्दल माझ्याशी चर्चा अशी झाली नाही; पण त्यांनी मला हा निर्णय सांगितला होता. विचारविनिमय वगैर काही केला नाही. भाजपमध्ये सुरुवातीला गेले नाहीत; पण ते भाजपतर्फे गेले. ते सहयोगी नंतर झाले, असे ऐकतोय.
यावेळी शाहू महाराज म्हणाले, २००९ नंतर संभाजीराजे यांनी वेगळी वाट पकडली. राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी घेण्याला मी विरोध केला होता; पण लोकशाही आहे, ते जाऊ शकतात. छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांचा तो वैयक्तिक निर्णय होता. त्यांचे सगळे निर्णय वैयक्तिक असतात. घरण्यात आम्ही दोघे तिघेच आहोत; पण सहमती घेऊन काही पाऊल उचलले. असे काही झाले नाही.
संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची आणि संघटना स्थापन करण्याची त्यांनी जी घोषणा केली त्याबद्दल कल्पना दिली नव्हती. पण राज्यसभेची निवडणुकीची तयारी ते जानेवारीपासूनच करत होते, असेही शाहू महाराज यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का ?