कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रगत व पर्यावरणपूरक भारत स्टेज-6 प्रणालीचा उपयोग नवीन दुचाकींच्या निर्मितीसाठी केला जात आहे. या तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. वैभव पाटणकर यांनी केले. दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन व कोल्हापूर जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक्स असो., न्यू पॉलिटेक्निक ऑटोमोबाईल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भारत स्टेज-6 तंत्रज्ञान' (बी एस-6 ) मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त हा विशेष उपक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सोमवारी (दि. 23 ) घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील टू-व्हीलर मेकॅनिक्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील होते.
शासनस्तरावर प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने दुचाकी तंत्रज्ञानातही बदल होत असून पर्यावरणपूरक दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. प्रदूषण रोखण्यासह मायलेजमध्ये सातत्य ठेवण्यासाठी नवतंत्रज्ञानाची जोड गरजेची असून ग्राहकाभिमुख सेवा देताना गुणवत्ताही टिकवणे आवश्यक असल्याचे प्रा. पाटणकर म्हणाले.
कार्यक्रमात सहायक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, अजित मोरे यांनी मार्गदर्शन केले. तर नियोजन संजय पाटणकर, इसाक मुजावर, प्रशांत साळोखे, सुनील धुमाळ, राजू मंडलिक यांनी केले.