

गुडाळ: गोकुळचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. या निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या 'त्या ' चौदाशे दूध संस्थांच्या वतीने आज गुरुवारी सकाळी ११ वाजता कोल्हापुरातील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात सत्यविजय कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महायुती मधील एका घटक पक्षाबाबत आणि अदृश्य शक्ती बाबत उद्रेक व्यक्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गोकुळच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चौदाशेच्या आसपास प्राथमिक दूध मतदार यादीतून अपात्र व्हाव्यात म्हणून अवसायनातील कारवाई, पोटनियमाचे कथित उल्लंघन करून सभासदत्व मिळवले म्हणून शासकीय पातळीवर कारवाईचे प्रयत्न झाले. या कारवाईग्रस्त संस्थांनी शासन आणि न्यायालयीन पातळीवर गेले ३ महिने संघर्ष करून सहकार न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातून आपल्या संस्था पात्र करून घेतल्या.
या कारवाईमागे महायुती मधील शह-काटशहाचे राजकारण आणि अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप या संस्था प्रतिनिधींनी वेळोवेळी केला. दरम्यानच्या काळात या संस्था प्रतिनिधींचा कोल्हापूर-पुणे येथील निबंधक कार्यालयातही उद्रेक दिसून आला होता.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी या संस्थांनी सत्यविजय कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, हा मेळावा म्हणजे गोकुळ मधील महायुतीच्या संभाव्य एकत्रित आघाडीच्या हालचालीला मोठा स्पीडब्रेकर ठरणार आहे. या मेळाव्यात या संस्थांचे ठरावदार 'त्या' घटक पक्षाच्या आणि अदृश्य शक्तीच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणार असल्याची चर्चा आहे. या उघड भूमिकेचे पडसाद गोकुळच्या निवडणुकीत मटणाची शक्यता आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच दूधसंस्था मेळाव्याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.